'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोचा 'रोशन सिंह सोढी' म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंह हा २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. अद्यापपर्यंत गुरुचरण सिंहचा शोध लागलेला नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. मात्र, गुरुचरण सिंहचा कोणताही मागमूस लागलेला नाही. आता या प्रकरणात एक नवीन आणि मोठे अपडेट समोर आले आहे. गुरुचरणला शोधण्यासाठी आता पोलीस ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या संपूर्ण कलाकार टीमची मदत घेणार आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, आता दिल्ली पोलीस या संदर्भात 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या कलाकारांची चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात गाफील राहायचे नाही आणि म्हणूनच त्यांनी 'सोढी'च्या मित्रांची आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. मात्र, एकही लिंक नजर चुकीने सुटू नये आणि अभिनेत्याची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी आता पोलिसांनी कलाकारांचीही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांना तपासात मदत होऊ शकते. तसेच, काही गोष्टी सुटत असतील, तर त्याही कळतील.
एवढेच नाही, तर या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीहून मुंबईला एक पथकही पाठवण्यात आले आहे. काही अहवालांमध्ये गुरुचरणला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारण, या दरम्यानच्या काळात तो आर्थिक संकटाचा सामना करत होता आणि लवकरच लग्न करणार होता. एवढेच नाही तर काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसून, त्याला हाय बीपीचा त्रास होत असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय तो नीट जेवण देखील खात नव्हता.
‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह हा २२ एप्रिलपासून बेपत्ता आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे गुरुचरणचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. अभिनेत्याचे चाहते चिंतेत आहेत आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच तो लवकरात लवकर घरी परतावा, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.
२०२०मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडल्यानंतर गुरचरण सिंह याला त्याचे पैसे मिळाले नव्हते, असे अनेकांनी म्हटले होते. याबद्दल निर्माते असित कुमार मोदींना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, 'असे काही नव्हते. तो काळ कोरोनाचा होता, आणि तो आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय तणावपूर्ण होता. त्या काळात शूटिंगही थांबलं होतं. शो सुरू राहील की, नाही याची देखील शाश्वती नव्हती. आपल्या आजूबाजूचे जग बदलत होते. सर्वांसाठी हा कठीण काळ होता. मात्र, आम्ही सगळ्यांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला होता.’
संबंधित बातम्या