बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे ओळखले जात होते. पण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या. तेव्हा पासून अभिषेक आणि ऐश्वर्या हे एकत्र दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला आहे असे म्हटले जात आहे. अशातच, अभिषेकने एका कार्यक्रमात विवाहित पुरुषांना सल्ला दिला आहे.
अभिषेक बच्चनने नुकताच ओटीटी अवॉर्ड्स २०२४ला हजेरी लावली. त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, तो एकापाठोपाठ एक जबरदस्त परफॉर्मन्स कसा देतो? यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, "हे खूप सोपे आहे. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. दिग्दर्शक जे सांगेल तेच आम्ही करतो. आम्ही शांतपणे काम करतो आणि घरी परततो."
अवॉर्ड्सच्या होस्टने मजेशीर अंदाजात अभिषेक बच्चनच्या वक्तव्याची तुलना ही पत्नीच्या सुचनांशी केली. तो म्हणाले हे तर पत्नीच्या सूचनांचे पालन करण्यासारखे आहे. अभिषेकने या वक्तव्याला सहमती दर्शवली आणि म्हणाला, "होय. सर्व विवाहित पुरुषांना हेच करावे लागते. बायको म्हणते तसच करावं लागतं." अभिषेकने ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर हे विधान केल्याने नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन वेगळे दिसल्यानंतर घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली यांनी एकत्र हजेरी लावली, पॅप्ससाठी कौटुंबिक फोटो काढले, तर ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यासोबत स्वतंत्रपणे कार्यक्रमाला पोहोचली होती. तेव्हा पासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले.
अलीकडेच आराध्या बच्चनचा वाढदिवस झाला. तिच्या बर्थडे पार्टीला अभिषेक गैरहजर असल्याचे म्हटले जात होते. मात्र, अभिषेकने सोशल मीडियावर बर्थडे पार्टीमधील एक व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्याचे आभार मानले. आराध्यासाठी हा दिवस खूप खास बनवल्यामुळे अभिषेकने आभार मानले होते. त्यामुळे अभिषेकच्या अनुपस्थितीच्या चर्चांना पूर्णविराम लागला.
वाचा: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
अभिषेक बच्चनने नुकतीच शूजित सरकार यांच्या आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटात एका कॅन्सरग्रस्त वडिलांची भूमिका साकारली. या व्यक्तीवर एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलणार असते. त्यामुळे त्याला आपल्या मुलीसोबत असलेले गुंतागुंतीचे नाते बदलायचे आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला असला तरी अभिषेकच्या अभिनयाने समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनाही प्रभावित केले. लवकरच तो बी हॅप्पी या चित्रपटात दिसणार असून शाहरुख खानस्टारर किंग आणि अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल 5 देखील काम करणार आहे.
संबंधित बातम्या