Aastad Kale Viral Post: मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे नेहमीच चर्चेत असतो. विषय कोणताही असो, अभिनेता आस्ताद काळे त्यावर आपलं स्पष्ट मत मांडतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असणारा आस्ताद त्याच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडन येथील वाघनखे भारतात आणण्याचा निर्णय घेतला होता. यासाठीचा करार देखील झाला असून, ही वाघनखे भारताकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची ती ऐतिहासिक वाघनखं पवित्र मायभूमीत परत येणार हे ऐकून सगळेच शिवप्रेमी आनंदून गेले आहेत. मात्र, आता आस्तादने एक पोस्ट शेअर करत यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
अभिनेता आस्ताद काळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्याने राज्य सरकारचे अभिनंदन केलेच, पण एक प्रश्नही उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये आस्ताद म्हणतो, ‘"वाघनखं" आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचं मानापासून अभिनंदन आणि आभार.’
'पण ती आपल्याला "देऊन टाकली" नाही आहेत, याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी. जगातील सर्व संग्रहालयं एकमेकांना स्वतःकडच्या वस्तू अशाप्रकारे काही काळापुरत्या देतच असतात. प्रचंड मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून यासाठी घेतली जाते. कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार त्यासाठी केला जातो. आणि एक प्रामाणिक शंका आहे. जाणकारांनी कृपया निरसन करावं. नतद्रष्ट अफझुल्याचं पोट फाडायला हीच नखं वापरली होती, याचा ठोस काही पुरावा सादर झाला आहे का? हे मी प्रामाणिकपणे विचारतोय. पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आत्ता स्वगृही असल्याचा आनंद निश्चितच आहे.'
आस्तादच्या या पोस्टवर आता चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'तसा काही पुरावा नाहीये पण सेंटिमेंट्स मात्र भरपूर आहेत.' तर, आणखी एकाने लिहिले, 'वाघनखे स्वतः महाराजांची असतील किंवा किमान एखाद्या मावळ्याची तरी असतील...पण ती आपली आहेत हे नक्की. प्रथम, पंचम किंवा शतम जॉर्ज, किंवा आद्य पतिव्रता लेडी माऊंटबॅटन किंवा त्याच शय्यासवयींची लेडी डायना किंवा मध्यंतरी मेलेली म्हाताराणी....यांची कोणाची तर नाहीयेत ना? ब्रिटिशांनी रायगडावरील बरीचशी कागदपत्रे जाळून नष्ट केली, अनेक वस्तू लुटून नेल्या. समतेच्या तत्त्वावर तशीच काही ब्रिटिश म्युझियम्स फोडली तर आपल्या बऱ्याच वस्तू मिळतील. पण आपले अहिंसेचे तत्त्व समतेच्या तत्त्वाआड येते.'
संबंधित बातम्या