Milind Gawali: रडावसं वाटलं तर माणसानं रडावं… ‘आई कुठे काय करते’च्या अनिरुद्धची ‘ती’ पोस्ट चर्चेत!
Milind Gawali Viral Post: मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावरील फोटो आणि पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
Milind Gawali Viral Post: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहेत. मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावरील फोटो आणि पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक अशी पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी मनोरंजन विश्वात ‘रडके’ चित्रपट का बनतात यावर भाष्य केले आहे. या पोस्टसोबतच त्यांनी त्यांच्या एका जुन्या चित्रपटातील सीन देखील शेअर केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘रडावसं वाटलं तर माणसानं रडावं मन मोकळं करावं... असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात, मनाला दुखावणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात, आपल्या मनाला त्याचा त्रास होत असतो आणि ते सतत चालू असतं. खूप आतल्या आत आपण साठवून ठेवत असतो. मग, अचानक बांध फुटतो आणि आपण ओक्साबोक्सी ढसाढसा रडायला लागतो आणि मग रडून झालं की मन शांत होतं, आपल्याला बरं वाटतं.’
पुचे त्यांनी लिहिले की, ‘पूर्वीच्या काळी कुणी गेलं आणि जर त्याचा जवळचा व्यक्ती रडत नसेल, तर त्याला जबरदस्ती रडायला लावायचे. कित्येक वेळा माझ्या कानावर ते शब्द पडलेले आहेत, मोकळी हो बाई मोकळी हो रड. एकदा निर्माते कै. अण्णासाहेब देशपांडे यांना मी म्हणालो होतो की, का आपण रडके पिक्चर्स करायचे? का ऑडियन्सला आपण रडवायचं? त्यांनी मला सांगितलं होतं की, गावा खेड्यातल्या बायका आयुष्यामध्ये खूप सोसतात खूप सहन करतात. सिनेमाच्या माध्यमातून त्या मोकळ्या होतात, त्यांचं मन शांत होतं.’
याचाच एक किस्सा त्यांनी यात सांगितला. ते म्हणाले, ‘आमच्या प्रोडूसर कै.वासवानीने ‘सुन लाडकी सासरची’ चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते. त्यांना इतकी खात्री होती की, सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार. सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्ही आमचं काम करत असताना मन मोकळं होतं. सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का? टॉक्सिक होत असेल का? स्ट्रेसफुल होत असेल का? म्हणून लोक आजारी पडत असतील का? महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं....’ त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.