Airaneechya Deva Tula Song Kissa : चित्रपट संगीताच्या इतिहासात काही गाणी अशी असतात, जी रसिकांच्या हृदयावर एक ठसा सोडून जातात. अशाच एका गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे ‘साधी माणसं’ चित्रपटातील "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे..." हे गीत. जगदीश खेबुडकर लिखित आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं आजही लोकांच्या मनात अजरामर आहे. गाण्याची निर्मिती आणि त्याचा संगीत प्रवाह आपल्या सर्वांच्या मनात विशेष भाव निर्माण करतो.
चित्रपटाच्या नावाला शोभणारे शब्द, लतादीदींचा मधुर आवाज आणि संगीतकार आनंदघन अर्थात लता मंगेशकर यांचे संगीत यामुळे हे गाणं श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. या गाण्याच्या लहरी आणि शब्दांच्या माधुर्यामुळे ‘साधी माणसं’ चित्रपटाला एक नवा अर्थ मिळाला आहे.
सुरुवातीला, भालजी पेंढारकर यांना ‘साधी माणसं’ चित्रपटात जगदीश खेबुडकर यांच्या गाण्यांचा समावेश करायचा नव्हता. त्यांनी स्वतः आणि गीतकार योगेश यांच्याकडून गीतलेखन करण्याचा विचार केला होता. यांची बातमी वृत्तपत्रात देखील छापून आली होती. परंतु, भालजी पेंढारकरांची लेखणी एका गाण्याच्या शब्दांवर येऊन अडकली होती. बराच वेळ विचार केल्यानंतरही शब्द सुचत नसल्यामुळे त्यांनी शेवटी जगदीश खेबुडकर यांना थेट फोन लावला आणि सांगितले, "जगदीश असशील तसा लगेच निघून ये."
जगदीश खेबुडकर तेव्हा शिक्षक म्हणून काम करत होते, पण त्यांनी तत्काळ सायकल काढली आणि भालजी यांच्या स्टुडिओत पोहोचले. स्टुडिओत पोहोचल्यावर भालजी पेंढारकरांनी त्यांना सांगितले की, चित्रपटासाठी एक गाणं सुचत नाही. त्यात एक लोहार आणि त्याच्या कुटुंबाचे कष्टकरी जीवन दाखवले जाईल. हा विचार ऐकताच जगदीश खेबुडकर यांना लगेच काही ओळी सुचल्या.
जगदीश खेबुडकर यांनी लगेच गाणं लिहून दिलं. सुरुवातीला गाण्याचे शब्द “ऐरणीच्या देवा तुला आगिनफुले वाहू दे…” असे होते. पण, या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी काही केल्या ‘आगिनफुले’ शब्द संगीतात बसत नव्हते. त्यामुळे, रेकॉर्डिंगच्या आयत्या वेळी ते बदलून "ठिणगी ठिणगी" केले गेले. आशयदृष्ट्या सारखे असलेल्या "आगिनफुले" आणि "ठिणगी ठिणगी" या शब्दांमध्ये एक मोठा फरक आहे.हे गाणं एका लोहार जोडप्याच्या दैनंदिन कार्याला व्यक्त करते, जिथे गायकाने गाण्याच्या शब्दांतून जीवनाच्या कष्टांना छानपणे दाखवले आहे.
या गाण्यात एक नायिका तिच्या नवऱ्याला ऐरणीवर काम करतांना मदत करत, गाणं गात आहे. त्या गाण्याच्या लहरींमध्ये लोहारकामाच्या ध्वनीला एक संगीत म्हणून दाखवले गेले आहे. गाण्याच्या व्हिडीओमध्ये कधी कधी भावनांचे इंद्रधनुष्य उमटते, ज्यामुळे हे गाणं केवळ एक गाणं नाही, तर एक भावना बनते. ‘साधी माणसं’ चित्रपटातील "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे" हे गाणं आजही लोकांच्या मनात अजरामर आहे.
संबंधित बातम्या