20 Years of Kal Ho Naa Ho Karan Johar Post: बॉलिवूडच्या काही आयकॉनिक चित्रपटांमध्ये 'कल हो ना हो' या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. या चित्रपटाची कथा, गाण्यांपासून ते प्रत्येक संवादापर्यंत सगळ्यांनीच प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर, करण जोहरने या चित्रपटाची कथा लिहिली होती. आज या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने करण जोहर याला वडिलांची आठवण आली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता शाहरुख खान अभिनित 'कल हो ना हो' हा चित्रपट २००३ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाची २० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना करण जोहर मात्र भावूक झाला आहे. वडील यश जोहर त्यांच्या आठवणीत व्याकुळ झालेल्या करण जोहर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये 'कल हो ना हो'च्या सुंदर आठवणी आहेत.
करण जोहरने व्हिडीओसोबत एक लांबलचक नोटही लिहिली आहे. यात तो म्हणाला, 'हा चित्रपट माझ्यासाठी आणि कदाचित आपल्या सर्वांसाठी भावनिक प्रवास ठरला आहे. अशा अप्रतिम स्टारकास्टला एका कथेत एकत्र आणणं ही कमालीची गोष्ट होती. 'कल हो ना हो' अजूनही जोरदार सुरू आहे आणि लोकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या हृदयात हक्काचं स्थान निर्माण केल्याबद्दल संपूर्ण कलाकार आणि कॅमेरामागील टीमचे अभिनंदन.'
करण जोहरने वडील यश जोहर यांच्या आठवणीत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. करणने लिहिले की, 'माझ्यासाठी हा शेवटचा चित्रपट होता, ज्यात मी माझ्या वडिलांसोबत काम केलं. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांची उपस्थिती दिसते. म्हणूनच मी आजही तो चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतो. प्रत्येक गोष्टीत आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद, बाबा. मला तुमची नेहमीच आठवण येईल.'
संबंधित बातम्या