Mahayuti Lok Sabha Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसाठी अवघे काही दिवस उरले असतानाही राज्यातील सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांचं जागावाटप झालेलं नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर याबाबत घोषणा होईल, असं मानलं जात होतं. मात्र, तसं होऊ शकलेलं नाही. हे जागावाटप रखडण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) आग्रही भूमिका असल्याचं बोललं जात आहे.
आपापले मूळ पक्ष सोडून अनेक आमदार घेऊन भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला लोकसभेत पुरेसं प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास वाटत होता. मात्र, त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांचं तिकीटही आता धोक्यात आलं आहे.
अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे एकमेव खासदार राष्ट्रवादीतून फुटून आले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गटात १३ विद्यमान खासदार आहेत. त्या सर्वांनाच पुन्हा संधी मिळेल असं बोललं जात होतं. त्यांनाही तसा विश्वास होता. मात्र, आता चित्र वेगळं आहे. शिंदे गटातील अनेक खासदारांच्या जागांवर भाजपच्या इच्छुकांनी दावा केला आहे. तर, ईडीचे आरोप असलेल्या काही खासदारांना संधी देण्यास भाजपनंच विरोध दर्शवला आहे.
या संदर्भात देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अमित शहा हे महाराष्ट्रात आले होते. त्यांच्यासोबतही या तिन्ही नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत जागावाटप बऱ्यापैकी ठरल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार शिंदे गटाला ८ ते १० तर अजित पवार गटाला २ ते ३ जागा मिळणार होत्या. मात्र, संघाच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणी यास आक्षेप घेतला. ‘महाराष्ट्र टाइम्स’नं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील महायुतीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडून येणार असतील तर त्यांना जास्त जागा का द्यायच्या? त्याऐवजी भाजपकडं जास्त जागा ठेवा आणि आपलेच उमेदवार निवडून आणा, असा आग्रह संघानं धरल्याचं समजतं.
एकनाथ शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांपैकी काही खासदारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्याची सर्वाधिक जबाबदारी भाजपवरच येणार आहे. शिवाय, शिंदे गटाच्या बहुतेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. ते करण्याऐवजी तिथं भाजपचा उमेदवार दिल्यास आपल्यासाठी निवडणूक सोपी होईल आणि पक्षाचे जास्त खासदार संसदेत पोहोचतील, असं संघाचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या