Pune loksabha EVM issue: पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळपासून मतदान करण्यास सुरुवात झाली. मात्र, काही मतदान केंद्रावर बिघाड झाल्याने मतदान खोळंबले होते. टिंगरे नगर येथे तब्बल एक तास मतदान यंत्रात बिघाड राहिल्याने येथील मतदान खोळंबले होते. तर तळेगाव येथील एका केंद्रावर देखील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान खोळंबले होते. हा बिघाड दुरुस्त करण्यात आल्यावर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले.
पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर, पुणे मतदार संघात आज सकाळ पासून मतदानास सुरुवात झाली. सकाळ पासून मतदान करण्यास मतदारांचा उत्साह दिसून येत होता. मतदारांच्या रांगा केंद्रांवर लागल्या होत्या. आज जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने सकाळच्या आणि दुपारी ३ पर्यंत मतदान करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले होते. दरम्यान, मतदान सुरू असतांना तिन्ही मतदारसंघात काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. पुण्यतील टिंगरे नगर येथील मतदान केंद्र १३२ आणि १३३ मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल १ तास येथील मतदान खोलबळे होते. तर मावळ मतदार संघातील तळेगाव येथे देखील मतदान यंत्रात बिघाड झाला होता.
मॉडेल कॉलनी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्र बदलल्यावर मतदान सुरळीतपणे सुरू करण्यात आले. तर शिरूर मतदारसंघात काळभोर येथील मतदान केंद्रावर ९.२० वाजता तांत्रिक बिघाडामुळे मतदान थांबले होते. हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर ९.३५ वाजता मतदान पुन्हा सुरू झाले.
पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी ३७ बॅलेट युनिट १३ कंट्रोल यूनिट आणि १७ व्हीव्हीपॅट मध्ये बिघाड झाल्याने हे यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी २४ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. शिरूर लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी २४ बॅलेट युनिट ८ कंट्रोल यूनिट आणि २४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. सध्या या तिन्ही मतदार संघाच्या लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे २५ ठिकाणी यंत्रणात बिघाड छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला. ईव्हीएम मशीन बंद असल्याने सकाळी मतदानाला आलेल्या मतदारांची गैरसोय झाली. या सर्व ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरुवात करण्यात आली.
बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सकाळी सात वाजता मतदानाला आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे परळीत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या ११ लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.
संबंधित बातम्या