AP Election results : शरद पवारांविना राष्ट्रवादीला पहिलं यश, अजित पवार राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी दावा करणार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  AP Election results : शरद पवारांविना राष्ट्रवादीला पहिलं यश, अजित पवार राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी दावा करणार

AP Election results : शरद पवारांविना राष्ट्रवादीला पहिलं यश, अजित पवार राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी दावा करणार

Updated Jun 03, 2024 08:06 AM IST

AP Election results : अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत शरद पवारांविना तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये पक्ष फुटल्यानंतरचा हा पहिलाच विजय आहे.

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत शरद पवारांविना तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत शरद पवारांविना तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत

AP Election results : अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. येथील १४ पैकी तीन जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा पहिला मोठा विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश येथील याचुली, लेकांग आणि बोरदुम्सा-दियुन मतदारसंघातून टोको ताताउंग, लिखा सोनी आणि निख कामिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाला मिळालेले हे पहिलेच निवडणूक यश आहे. दरम्यान, आता अजित पवार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Mumbai Bomb Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आरोपीचा तुरुंगात खून, ५ कैद्यांनी बेदम मारहाण करून केली हत्या

निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या अजित पवार यांच्या गटाला खराराष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अरुणाचल प्रदेशात दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्यात यश आले आहे. २००९ मध्ये ३६ पैकी ५ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. २०१४ मध्ये त्यांनी ९ जागा लढवल्या होत्या, पण त्यांना खातेही उघडता आले नव्हते. २०१९ मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने निवडणूक लढवली नव्हती.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश व सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ६० पैकी तब्बल ४६ जागांवर विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजप सत्तेत बसणार आहे. तर सिक्कीम विधानसभेत भाजपचा दणदणीत पराभव झाला आहे. येथे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) या सत्ताधारी पक्षाने ३२ पैकी ३१ जागा जिंकून सत्ता मिळवली आहे.

Maharashtra Weather Update : वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार! राज्यात 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

तर अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला आणि हा पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यात दिला. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पक्षाने मिळवलेलं हे पहिलंच राजकीय यश आहे.

फेसबूकवर पोस्ट लिहून अजित पवार यांनी साजरा केला आनंद

अजित पवार यांच्या या पहिल्या यशानंतर त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी लिहिले की, अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो. विशेष बाब म्हणजे एकूण राज्यात एकूण मतांपैकी १०.०६ टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर आम्ही विकासाची गंगा अरुणाचलमध्ये आणू. आमचे हे यश पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मूल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे आदर्श उभे करेल यात शंका नाही. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

Pune Accident : पुण्यात भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक! ६ वर्षाच्या मुलासह दोन जणांचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या विजयाचे श्रेय अरुणाचल प्रदेशातील पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांच्या प्रयत्नांना दिले आहे. अरुणाचल प्रदेशच्या जनतेने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्व, दूरदृष्टी आणि क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. पुढील पाच वर्षांसाठी नवी विधानसभा स्थापन करताना आम्ही पारदर्शकता, सचोटी आणि सर्वसमावेशक प्रशासनाची तत्त्वे अबाधित ठेवण्याचा संकल्प करतो. राष्ट्रवादीला एकूण मतांच्या १०.०६ टक्के मते मिळाली होती, असेही श्रीवास्तव यांनी नमूद केले.

नामसांग विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार नगोंगलिन बोई यांचा चुरशीच्या लढतीत पराभव झाला. त्यांचा भाजप उमेदवार वांगकी लोवांग यांनी अवघ्या ५६ मतांनी पराभव केला. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यांचे तीनही उमेदवार भाजपविरोधात विजयी झाले. त्यामुळे आता महाराष्ट्र, नागालँड, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार झाले आहेत.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मागणार

निवडणुकीच्या निकालामुळे पक्षाला गेल्या वर्षी गमावलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळण्याची चिन्हे आहेत. शरद पवार साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना आम्ही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला होता, असे श्रीवास्तव यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले. आता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे हा दर्जा पक्षाला पुन्हा बहाल करण्यात यावा यासाठी दाद मागणार आहोत असे श्रीवास्तव म्हणाले. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने राष्ट्रीय पक्षाच्या पात्रतेचे निकष पूर्ण केले नसल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाने ११ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या