Uddhav Thackeray Speech at Buldhana : ‘एक अकेला सब पर भारी अशी घोषणा नरेंद्र मोदी देतात, मग उद्धव ठाकरेचा पराभव करण्यासाठी तुम्हाला कचरा गोळा का करावा लागतो,' असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांना केला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भाजपनं छोटे-छोटे पक्ष एनडीएच्या आघाडीत घ्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
भाजपच्या या रणनीतीची उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जोरदार खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या सभागृहात केलेल्या भाषणाची आठवण दिली. 'एक अकेला सब पे भारी…' असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. तोच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली. ‘एकटा भारी म्हणता, मग उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी कचऱ्याची गाडी का फिरवता? कोपऱ्या-कोपऱ्यातला कचरा का जमा करता? सगळा कचरा गोळा करून उद्धव ठाकरेंशी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मला संपवायचा प्रयत्न करायचाच असेल तर करून बघा. गाठ माझ्या मावळ्यांशी आहे,’ असा सवाल उद्धव यांनी केला.
मी दोन पक्ष फोडून परत आलो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्याचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. तुमच्यावर ही काय वेळ आली?,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री असताना करोना काळात राज्याच्या जनतेने मला पूर्ण साथ दिली. स्वत:च्या कुटुंबातील भाऊ, मुलगा मानलं. कुटुंबप्रमुख मानलं. माझी प्रत्येक सूचना मान्य केली. त्यामुळंच आपण महाराष्ट्र वाचवू शकलो. तशीच साथ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गद्दारांना गाडण्यासाठी आणि हुकूमशाही मोडून काढण्यासाठी द्या. कितीही भूलथापा मारल्या तरी भाडोत्री जनता पक्षाच्या नादी लागू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनतेला केलं.
संबंधित बातम्या