Vishal Patil sangli loksabha : सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील संघर्ष संपवण्याची चिन्हे दिसत नाहीत.या जागेचा तिढा दिवसांगणिक वाढत चालला आहे. मागील दोन निवडणुकांचा अपवाद वगळता सांगली पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. ठाकरेंनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली घेतल्याने उमेदवार मागे घेण्याची शक्यता धूडकावून लावली आहे. त्यानंतरही काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते नाराज असून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
विशाल पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्जही दाखल केला. हा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सांगलीची जागा जर काँग्रेसला सुटली व काँग्रेसकडून माझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही संधी दिली तरी मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार असल्याचे विशाल पाटील म्हणाले.
दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज विशाल पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. उमेदवारी दाखल केल्यानंतरविशाल पाटील म्हणाले की, भाषणात बोलताना स्वाभाविकपणे काही भावना उफाळून येतात. काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा राहिला आहे. वसंतदादा पाटलांनी या जिल्ह्यात काँग्रेस घराघरात रुजवली. मात्र आता गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारच दिला जात नाही. त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र आहेत. काँग्रेसकडून मलाच उमेदवारी मिळावी असे काही नाही. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून तुम्ही काँग्रेसचा उमेदवार देणार नसाल तर मी माघार घ्यायला तयार आहे.
विशाल पाटील यांनी सांगितले की, आम्ही दोन अर्ज काँग्रेस पक्षाकडून भरले आहेत, एक अर्ज अपक्ष भरला आहे आणि आणखी एक अर्ज भरण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली आहे.
केवळ पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनीही माझ्याकडे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही आमच्याकडे या. राज्य नेतृत्वाकडून असा कोणताही सल्ला आलेला नाही. मात्र असा सल्ला आला असता तरी आम्ही सांगितलं असतं की आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहेआणि पुढेही ठाम राहू.
सांगलीची जागा काँग्रेसला मिळू द्यायची नाही, असा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं हे बंड आहे. कारण काँग्रेसच्या हक्काची जागा जाऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. या जागेवर काँग्रेसचा अधिक सक्षम इतर कोणी उमेदवार असेल तर द्या, मी माघार घ्यायला तयार आहे. पण या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा, काही घराणी संपावी, असा प्रयत्न सुरू आहे. आज माझी वेळ आहे, उद्या आणखी कोणाची वेळ येईल. मी असेल किंवा विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील आम्ही सर्वजण विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करत आहोत. हे कदाचित कोणाला तरी बघवलं जात नसेल. त्याचा निवडणुकीनंतर समाचार घेऊ, असा इशारा विशाल पाटलांनी कोणाचेही नाव न घेता दिला.
संबंधित बातम्या