महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर जेलमध्ये जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय शिल्लक होते. जड अंतःकरणाने मी ठाकरे गट सोडला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये,असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. दरम्यान, शिंदे गटाने उमेदवारी देऊनही रवींद्र वायकर (Ravindra waikar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याबद्दलची आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याने महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे.रविंद्र वायकर म्हणाले की, तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. त्यात या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवण्यात आले. यामुळे पक्षांतर करण्यावाचून माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता,असा गौप्यस्फोट रवींद्र वायकर यांनी केला आहे.
वींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा करून महायुतीची झोप उडवली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. चुकीच्या प्रकरणात मला गोवलं गेलं. त्यामुळे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याजवळ होते. त्यामुळे मी जड अंत:करणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव होता. या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवल्याने मी व्यथित झालो होतो. नियतीने अशी वेळ कुणावरही आणू नये,असं रवींद्र वायकर म्हणाले.
यावेळी रवींद्र वायकर हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरेंच्याआठवणी काढून त्यांचा कंठ दाटून आला.मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून माझ्या खांद्यावर शिवधनुष्य आहे.५० वर्ष एक शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर मला ठाकरे घराण्याची साथ सोडावी लागली. एखादी व्यक्ती जशी कुटुंबाला पारखी होते, तशीच काहीशी माझी अवस्था झाली होती. हा नियतीचा खेळ आहे, असं वायकर म्हणाले.
यावेळी वायकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेच मला क्लिनचीट दिली आहे. पण माझे प्रकरण राजकीय असल्याने माझ्यावर दबाव आणला गेला.मला तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं याशिवाय पर्याय नव्हते. त्यामुळे मला दुसरा पर्याय निवडावा लागला, असंही ते म्हणाले.
रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे दोन शिवसैनिकात येथे सामना होत आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातील खासदार होते. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ते आता आपल्या मुलाच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचं चित्र दिसत आहे.
रवींद्र वायकरांच्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले की, जेल की भाजप हा पर्याय माझ्याकडेही होता. इतकेच काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे राहिलेल्या सर्व आमदारांसमोर हाच पर्याय होता. खासदार असो, आमदार असो किंवा सामान्य शिवसैनिक असूदेत, सर्वांना या परिस्थितीतून जावे लागले.मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्यापैकी कोणीही पक्ष बदलला नाही. रवींद्र वायकर निष्ठेच्या मोठ्यामोठ्या गप्पा मारत होते. उद्धव ठाकरेंकडून अनेक पद भुषवल्यानंतर स्वत:च्या स्वार्थासाठी शिंदेंकडे गेले. मात्र प्रचाराला सुरुवात झाल्यावर त्यांना कळले की, जनता व सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. त्यामुळे सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
संबंधित बातम्या