अहमदनगर मतदारसंघात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कॅबिनेट मंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे (sujay and Radhakrishna vikhe patil) यांच्याबाबत एक खळबळजनकगौप्यस्फोट केला. या पितापुत्राने दिल्लीत जाऊन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. यावरुन विखे-पाटील पितापुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीची रंगत वाढली असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या अहमदनगरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून हा मतदारसंघ विविध कारणांमुळे चर्चेत आहे. येथे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याविरोधात शरद पवार गटाने निलेश लंके यांना मैदानात उतरवून भाजपसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी वंचितवर टीका केली होती. त्यांना उत्तर देतना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे पाटील हे २८ मे २०२३ रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी रात्री साडेअकरा वाजता दिल्लीतील तुघलक लेनवरील निवासस्थानी भेटून आले आहेत. ही घटना बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही.
त्याचबरोबर बाळासाहेब थोरातांसाठी दुसरी धोक्याची घंटा म्हणजे ९ जून २०२३ रोजी दुपारी तीन वाजता खर्गे हे सोलापूरहून बंगळुरला गेले. त्यापूर्वी८ जून २०२३ रोजी राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही खर्गेंची भेट घेतली होती. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मी सांगत नाही. पण भाजपची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील आहेत.
त्यामुळे आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी स्वत:चा पक्ष वाचवावा. अन्यथा राज्याती काँग्रेस कधी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हातात जाईल, ते सांगता येत नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी थोरातांना लगावला.
संबंधित बातम्या