sharad pawar on baramati lok sabha results : राज्यासह देशाचंही लक्ष लागून राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांच्या संघर्षात अखेर काकांनीच बाजी मारली आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. या निकालावर शरद पवार यांनी मोजक्या शब्दांत पण सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निकालांवर भाष्य केलं. साहजिकच यावेळी त्यांना बारामतीच्या निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी थोडक्यात भाष्य केलं.
'बारामतीमध्ये काही वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. विशेषत: इथला बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, त्याच्याशी माझं ६० वर्षांचं नातं आहे. माझी सुरुवातच तिथून झाली होती. प्रचार करो न करो, तिथला सामान्य माणूस जो आहे, त्याची मानसिकता मला माहीत आहे. मी तिथं गेलो असू किंवा नसू, तिथले लोक योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची मला खात्री होती, असं शरद पवार म्हणाले.
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे आमदार म्हणून निवडून जातात. या मतदारसंघातच सुप्रिया सुळे यांना भरघोस आघाडी मिळाली आहे. शरद पवार यांनी भर पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी या मतदारसंघातील आकडेवारी विचारली. अजित पवार यांना हा त्यांचा अप्रत्यक्ष इशारा असल्याचं बोललं जात आहे.
‘उत्तर प्रदेशमधील निकाल आमच्यासाठी अनपेक्षित होता. दक्षिणेबद्दल विश्वास होता. पण यूपीत इतकं यश मिळेल असं वाटलं नव्हतं. हिंदी पट्ट्यात आम्हाला आणखी काम करावं लागणार आहे यात शंका नाही. मध्य प्रदेशातही काम करावं लागणार आहे. मात्र आता यूपीनं देशाला एक दिशा दिली आहे, असं शरद पवार म्हणाले. ’देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे. यापूर्वी भाजपला यूपीत जे यश मिळायचं, त्याचं मार्जिन निर्णायक असायचं. आता त्यांना खूप मर्यादित स्थान राहिलंय. आम्ही यापुढं अधिक लक्ष दिलं तर उत्तरेचा चेहरा बदलायला मदत होईल. ती काळजी आम्ही घेऊ, असंही पवारांनी यावेळी सांगितलं.
संबंधित बातम्या