Kangana Ranaut Mandi Lok Sabha: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री घेत हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. भाजपकडून अभिनेत्रीला निवडणुकीचे तिकीट देण्यात आले होते. सध्या बॉलिवूडमध्ये प्लॉप ठरत असलेली कंगना रनौत निवडणुकीच्या मैदानात तरी हिट ठरणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. पण, अखेर कंगनाने करून दाखवलं आहे. बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत हिने आता निवडणुकीच्या रणात आपला जलवा दाखवला आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत पदार्पण करणारी अभिनेत्री-राजकारणी कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून सत्तेच्या रिंगणात उतरली होती. पहिल्याच निवडणुकीत कंगना रनौत हिचा विजय झाला आहे. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कंगना रनौतने ७२,०८८ मतांनी विजय मिळवला आहे. आता सगळीकडूनच अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार परिषदेत कंगना रनौत म्हणाली की, ‘आम्ही ही निवडणूक नरेंद्र मोदींच्या नावाने लढवली आहे. त्यांची विश्वासार्हता, त्यांची हमी आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास याचाच परिणाम आहे की, आम्ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहोत.’
हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये १ जून २०२४ रोजी निवडणूक पार पडली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळली आहे. या दोन्ही पक्षांनी यंदाच्या निवडणुकीत दोन नवे तरुण चेहरे उतरवले होते. यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर कंगनाने हिंदुत्वाचा प्रचार करत लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला होता. तर, विक्रमादित्य सिंह हा सुरुवातीपासूनच एक मातब्बर राजकारणी आहे.
अभिनेत्री कंगना रनौत पहिल्यांदाच राजकारणात हात आजमावत आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असलेल्या कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर ती निवडणूक जिंकली, तर ती तिच्या फिल्मी करिअरला अलविदा म्हणू शकते, कारण तिला एका कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कंगनाला विचारण्यात आले होते की, ती चित्रपट आणि राजकारण एकत्र कसे सांभाळेल, ज्यावर उत्तर देताना तिने म्हटले की, 'मी चित्रपटांमध्ये गुंतलेली आहे, मी भूमिका करते आणि मी दिग्दर्शनही करते. राजकारणात लोक माझ्यासोबत येण्याची शक्यता दिसली, तरच मी राजकारण करेन. मला फक्त एकच गोष्ट करायची आहे.’ कंगनाच्या या वक्तव्यानंतर असे मानले जात आहे की, जर ती निवडणूक जिंकली, तर ती मनोरंजन विश्वाला अलविदा म्हणू शकते.
कंगना रनौतने आतापर्यंत ४२ चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२०मध्ये तिने मणिकर्णिका फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊसही सुरू केले. पद्मश्री पुरस्कार, ४ राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. कंगना अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले, तर कंगना १२वी पास असून, तिच्याकडे ९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
संबंधित बातम्या