election commission of india: प्रकाशक आणि मुद्रकाचा तपशील न सांगता जाहिरात प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एका मराठी दैनिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीच्या पहिल्या पानावर ५ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत 'भाजपला मतदान न केल्यास पाकिस्तानात जल्लोष होईल', असे छापण्यात आले होते. यानंतर बुधवारी ऐरोली येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुर्भे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२७ (अ), १२३ (अ) व १२५ अन्वये गुन्हा दाखल केला.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाला या प्रकरणात तथ्य आढळले असून प्रिंटिंग प्रेस नवी मुंबईतील महापे येथे असल्याने आम्हाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. ही जाहिरात प्रक्षोभक असून शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा यामागचा हेतू असल्याचे आढळून आल्याने वृत्तपत्र आणि पक्षाविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या नियमांना आचारसंहिता असे म्हणतात. निवडणुकीत सहभागी झालेल्या सगळ्या पक्षांना आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असते. आचारसंहितेच उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जावा लागते.
निवडणूक काळात वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमध्ये सरकारी तिजोरी खर्च करून जाहिराती देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली. राजकीय बातम्यांचे पक्षपाती कव्हरेज आणि सत्ताधारी पक्षाच्या बाजूने केलेल्या कामगिरीच्या प्रसिद्धीसाठी अधिकृत प्रसारमाध्यमांचा गैरवापर काटेकोरपणे टाळला पाहिजे, असे एमसीसीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी लोकसभा निवणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, यंदा लोकसभेची निवडणूक सात टप्प्यात होत आहे. १९ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. देशात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. यावेळी लोकसभेच्या ५४३ जागांसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ५४५ जांगावर लोकसभा निवडणूक लढवण्यात आली. मात्र, यावेळी अँगलो इंडियन समाजासाठी राखीव जागांची तरतूद रद्द करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी लागणार आहे.
संबंधित बातम्या