Rahul Gandhi : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकणार; राहुल गांधी यांनी दिला शब्द
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकणार; राहुल गांधी यांनी दिला शब्द

Rahul Gandhi : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकणार; राहुल गांधी यांनी दिला शब्द

May 06, 2024 06:51 PM IST

Rahul Gandhi on Reservation : संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अधिक आक्रमकपणे प्रचार सुरू केला आहे.

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकणार; राहुल गांधी यांनी दिला शब्द
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकणार; राहुल गांधी यांनी दिला शब्द (PTI)

Rahul Gandhi on Reservation : 'लोकसभा निवडणुकीनंतर आमची इंडिया आघाडी सत्तेत आल्यास आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकू,' अशी ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिली. ‘गरिबांसाठी आरक्षणाची मर्यादा वाढवू,’ असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

मध्य प्रदेशातील खरगोन इथं झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. राहुल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जातनिहाय जनगणना, आरक्षण व सर्वांना समान न्याय या तीन मुद्द्यांवर भर दिला आहे. खरगोन येथील सभेत ते पुन्हा एकदा आरक्षणावर बोलले. आरक्षणाची मर्यादा सध्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. त्यापेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असल्यास संसदेची मंजुरी लागते. मात्र, काँग्रेस सरकार आल्यास थेट घटनादुरुस्ती करून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादाच वाढवणार असल्याचं राहुल यांनी सांगितलं.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व जाती-जमातींसाठी १० टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींसाठी खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम १५ (५) च्या अनुषंगानं कायदा केला जाईल, असंही राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा हवाला देत सांगितलं.

खरगोन इथं मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी इथल्या जनतेला नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं. भाजपचे लोक आरक्षण रद्द करण्याची भाषा का करतात हे पंतप्रधानांना विचारा, असं राहुल गांधी म्हणाले.

राज्यघटना वाचवण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं राहुल गांधी म्हणाले. 'संविधान बदलायचं नरेंद्र मोदी यांनी ठरवून टाकलं आहे. तसं झालं तर आदिवासींना मिळालेलं सर्व काही नष्ट होईल. भारतावर २२ ते २५ अब्जाधीशांचं राज्य असेल. आदिवासींच्या पाण्यावर, जंगलांवर, जमिनीवर अब्जाधीशांची नजर आहे. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास हे सर्व हिसकावून कोट्यधीशांच्या ताब्यात दिलं जाईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

मोदी हे अब्जाधीशांचे खास मित्र

'देशातील अब्जाधीश पंतप्रधानांचे खास मित्र आहेत. पंतप्रधान उद्या इथं येतील तेव्हा त्यांना सांगा, खटाखट, खटाखट, खटाखट… तुम्ही जे अब्जाधीशांसाठी काय केलं, ते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे गरिबांसाठी करणार आहेत, असं त्यांना सांगण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी उपस्थितांना केलं. भाजपचे लोक आदिवासींचा अपमान करतात आणि मग तुमचीच मतं मागतात. तुम्ही लोक त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असं राहुल गांधी म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचा बचाव काय?

राज्यघटना बदलून आरक्षण रद्द करण्याचा भाजपचा डाव आहे हा प्रचार काँग्रेस करत असल्यानं या मुद्द्यावर भाजप बचावात्मक पवित्र्यात आहे. भाजपनंही काँग्रेसला उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदी व भाजपचे मोठे नेते संविधान व आरक्षणावर खुलासा करत आहेत. 'जोपर्यंत संसदेत भाजपचा एक तरी खासदार आहे, तोपर्यंत अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण संपुष्टात येणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच स्पष्ट केलं. मुस्लिम आरक्षण घटनात्मक नाही, असंही शहा म्हणाले. तेलंगणमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप मुस्लिम आरक्षण रद्द करेल आणि एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण देईल, असंही त्यांनी सांगितलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या