केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल २०२४ रोजी तर सांगली लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक २६ एप्रिल व ७ मे २०२४ या मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
सरकारने जाहीर केलेली सुट्टी राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, कंपन्या व संस्थाना लागू राहील. जर अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास अशा व्यवस्थापनाने कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकान्वये निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधितांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
मुंबई शहर जिल्ह्याच्या बहुतांश सीमा या सागराशी संलग्न असल्यामुळे सागरी सीमा सुरक्षेशी संबंधित कोस्ट गार्ड मेरीटाइम बोर्ड आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश यादव यांनी संबंधितांना दिले.
संबंधित बातम्या