Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: राज्यात सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र, त्या आधी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांची सामनातून मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठे वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. भाजपला सोडून ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला कधीच वाटले असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी केला आहे. दरम्यान फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे भाजप सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला वाटले नव्हते. आमचा पक्ष हा वैचारीक निष्ठेला सर्वाधिक महत्त्व देतो. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असा कसा वागू शकतो यावर आमचा विश्वास नव्हता.
मात्र, ही आमची चूक होती. बाळासाहेब ठाकरेंविषयी असलेल्या आदरामुळे आम्ही काही गोष्टी समजून घेतल्या. यामुळे आम्ही कधीच काही बोललो नाही. मात्र, जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. त्यांना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शरद पवारांबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार हे महायुतीत आले आहे. मात्र, तेव्हापासून अजित पवारांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. शरद पवारांनी स्वत: पाच चिन्हांवर निवडणुका लढविल्या असून त्यांनी अनेक वेळा भूमिका देखील बदलल्या आहेत. बारामतीच्या मतदानानंतर निकाल अपेक्षेप्रमाणे लागणार असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये छोट्या पक्षांचे विलीनीकरण ही नवी चर्चा आता त्यांनी सुरू केली आहे.
संबंधित बातम्या