Yashasvi Jaiswal record : भारताचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जयस्वाल याची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. भारत आणि झिम्बाब्वे संघात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्यानं टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे. अनेक दिग्गजांसह रोहित शर्मा याचाही विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. यशस्वी हा २०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघानं बुधवारी झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा टी-२० सामना २३ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. विश्वविजेत्या संघाचा भाग असलेले संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी या सामन्यातून पुनरागमन केलं. या तिघांपैकी केवळ यशस्वीनं अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. यशस्वीनं शुभमन गिलसह ४९ चेंडूत ६७ धावांची भागीदारी केली. तो २७ चेंडूत ३६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. छोट्याशा खेळीत त्यानं ४ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.
या सामन्यातील ३६ धावांसह सलामीवीर यशस्वी जयस्वालनं २०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ८४८ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमधील यंदाची ही सर्वाधिक धावसंख्या आहे. ही कामगिरी करताना यशस्वीनं अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रानला मागे टाकत टाकलं आहे. तसंच, ८३३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मालाही मागे टाकलं आहे.
८४८ - यशस्वी जैस्वाल
८४४ - इब्राहिम झद्रान
८३३ - रोहित शर्मा
८३३ - कुसल मेंडिस
७७३ - रहमानउल्ला गुरबाज
७०९ - बाबर आझम
प्रथम फलंदाजी करताना भारतानं १८३ धावा केल्या होत्या. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑफस्पिनर सुंदरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संघ सहा गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावाच करू शकला. आवेश खान यानं ३९ धावांत दोन तर खलील अहमदनं १५ धावांत एक बळी घेतला.
डिओन मायर्सने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावलं, पण तो झिम्बाब्वेला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्यानं ४९ चेंडूत ६५ धावा केल्या. त्यानं झिम्बाब्वेच्या अत्यंत खराब सुरुवातीनंतर क्लाईव्ह मेदांडे (३७) याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी ७७ धावांची अखंड भागीदारी केली आणि सातव्या विकेटसाठी वेलिंग्टन मसाकादझा (नाबाद १८) सोबत २१ चेंडूत ४३ धावांची अखंड भागीदारी केली.
तत्पूर्वी, भारताकडून शुभमन गिलनं ४९ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह ६६ धावांची केली. त्याला यशस्वी जयस्वालनं ३६ आणि ऋतुराज गायकवाड यानं ४९ धावांची साथ दिली. त्या जोरावर भारतीय संघानं १८२ धावापर्यंत मजल मारली.
संबंधित बातम्या