Team India: भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली मोठी जबाबदारी फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये सुरू होणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल. गेल्या महिन्यात बार्बाडोसयेथे झालेल्या विश्वचषक विजयानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ चाहत्यांसाठीच नव्हे तर एकूणच भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला भारत आयसीसी स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याची अफवा पसरली आणि बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला चॅम्पियन्स ट्रॉफीचे ठिकाण बदलण्याची किंवा भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक तटस्थ राष्ट्रात ठेवण्याची विनंती केली. आयसीसीने बीसीसीआयच्या विनंती मान्य न केल्यास भारतीय संघ या स्पर्धेतून माघार घेईल का? अशी अटकळ बांधली जात आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मात्र या सर्व अफवांचे खंडन केले आहे. कोणत्या सूत्राने अशी माहिती दिली हे आम्हाला माहित नाही. बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही," शुक्ला यांनी दिप्रिंटला सांगितले.
दोन्ही शेजारी देशांमधील वाढत्या राजकीय तणावामुळे २००८ च्या आशिया चषकानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तर, २०१३ च्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान केवळ बहुदेशीय स्पर्धांमध्ये आमनेसामने आले आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये पाकिस्तानला संपूर्ण आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवायचे होतेय. परंतु, बीसीसीआयने भारतीय संघाला देशात पाठविण्यास टाळाटाळ केल्याने आशियाई क्रिकेट परिषदेने हायब्रीड मॉडेलचा अवलंब केला, ज्यामध्ये भारताचे सर्व सामने स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह श्रीलंकेत खेळवले गेले.
मे २०२५ मध्ये शुक्ला यांनी भारतीय भूमिका स्पष्टपणे सांगितली होती की, संघाला केंद्र सरकारकडून परवानगी मिळते की नाही? यावर हे पूर्णपणे अवलंबून आहे. ते म्हणाले, 'चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाबतीत भारत सरकार जे सांगेल ते आम्ही करू. भारत सरकार परवानगी देईल तेव्हाच आम्ही आमची टीम पाठवतो. त्यामुळे आम्ही भारत सरकारच्या निर्णयानंतर पुढील पाऊल उचलू, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
संबंधित बातम्या