सध्या आयपीएल २०२४ हे क्रिकेट प्रेमींसाठी मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे. परंतु या स्पर्धेनंतर अवघ्या काही दिवसांनी टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे. यामुळे टीम इंडियाची निवड समिती खेळाडूंच्या आयपीएल कामगिरीवर विशेष लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, टी- 20 विश्वचषक संघासाठी ८ खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली आहेत, असे बोलले जात आहे. परंतु संघातील इतर ७ स्थानांवर अद्याप बरीच चर्चा सुरू आहे. रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे, पण त्याच्यासोबत सलामीला कोण खेळणार हा मोठा प्रश्न आहे. या जागेसाठी शुभमन गिल, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल अशी नावे पुढे आली आहेत.
टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासोबतच रोहित शर्मा सलामीचा फलंदाजही असेल, पण त्याचा जोडीदार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. IPL २०२४ बद्दल बोलायचे तर, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांच्या कामगिरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.
गिलने आतापर्यंत ६ सामन्यात २५५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट देखील १५१ पेक्षा जास्त आहे. याशिवाय त्याने चालू मोसमात ८९ धावा आणि ७२ धावांच्या दोन अर्धशतकी खेळीही खेळल्या आहेत.
दुसरीकडे, यशस्वी जैस्वालची बॅट आतापर्यंत पूर्णपणे शांत आहे. शुभमन गिलच्या तुलनेत, जैस्वालची स्थिती खूपच खराब आहे, कारण तो ५ सामन्यात केवळ ६३ धावा करू शकला आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २४ आहे.
तर विराट कोहली तुफान फॉर्मात आहे. त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. कोहलीने आतापर्यंत ६ सामन्यात ३१९ धावा केल्या आहेत. कोहलीने ७९.७५ च्या सरासरीने आणि १४१.७७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
पण विराट कोहली नंबर तीनसाठी सर्वात मोठा दावेदार आहे. जरी तो आयपीएलमध्ये ओपनिंगला खेळत असला तरी. त्यामुळे ओपनिंगसाठी खरी चुरस गिल आणि जैस्वाल यांच्यातच आहे.
पण तरी निवडकर्त्यांना या दोघांंपैकी एकाची निवड करणे सोपे जाणार नाही कारण यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भरपूर धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत जयस्वालसाठी पुढील ३-४ सामने खूप महत्त्वाचे ठरू शकतात कारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होणार आहे. सध्याचा फॉर्म पाहता गिलला रोहित शर्मासोबत सलामीची संधी मिळू शकते.
संबंधित बातम्या