आजपासून जवळपास १९ वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशीच महेंद्रसिंह धोनीने धमाका केला होता. दिवळीच्या दिवशी धोनीने त्याची वनडे क्रिकेट करिअची सर्वात मोठी खेळी खेळली होती. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर ३१ ऑक्टोबर २००५ रोजी, दिवाळीच्या दिवशी, भारत आणि श्रीलंका यांच्यात ७ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने ५० षटकांत ४ गडी गमावून २९८ धावा केल्या. अशाप्रकारे भारतासमोर २९९ धावांचे लक्ष्य होते. याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सचिन तेंडुलकर अवघ्या २ धावा करून बाद झाला. तर वीरेंद्र सेहवाग ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्या दिवशी महेंद्रसिंग धोनीला टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. माही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच होती. राहुल द्रविड आणि युवराज सिंगसारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले, पण महेंद्रसिंह धोनी एका टोकाहून षटकार आणि चौकार मारत राहिला.
महेंद्रसिंग धोनीने आपल्या झंझावाती खेळीत १५ चौकार आणि १० षटकार मारले. तो १४५ चेंडूत १८३ धावा करून नाबाद परतला. त्याचवेळी भारताने ४६.१ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. महेंद्रसिंग धोनीशिवाय वेणुगोपाल राव ३९ चेंडूत १९ धावा करून नाबाद परतला.
धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी श्रीलंकेने ५० षटकांत ४ गडी गमावून २९८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेसाठी सलामीला आलेल्या कुमार संगकाराने १४७ चेंडूत सर्वाधिक १३८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय महेला जयवर्धनेने ७० चेंडूत ७१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १० चौकार मारले. तर परवेझ महारूफने १६ चेंडूत झटपट ३३ धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून अजित आगरकरने सर्वाधिक २ बळी घेतले. तसेच जयप्रकाश यादव आणि वीरेंद्र सेहवाग यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
संबंधित बातम्या