West Indies chances to win t20 world cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ साठी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह २० संघ सज्ज झाले आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
टी-20 वर्ल्डकपचे १६ सामने यूएसएमध्ये खेळले जाणार आहेत, तर उर्वरित ३९ सामने कॅरेबियन बेटांवर खेळले जातील. या स्पर्धेत बाद फेरीसह एकूण ५५ सामने खेळले जातील. ही स्पर्धा २९ दिवस चालेल.
दरम्यान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोनच संघ असे आहेत, ज्यांनी आतापर्यंत दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. वेस्ट इंडिज संघाची कमान रोव्हमन पॉवेलकडे आहे.
अशा परिस्थितीत वेस्ट इंडिज २०२४ मध्ये तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची शक्यता दिसत आहे. वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा चॅम्पियन कसा होऊ शकतो, हे आपण येथे जाणून घेऊया.
टी-20 हा फॉरमॅट ऑलराउंडर्सचा समजला जातो. या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडू खूप महत्वाचे असतात. कारण एक अष्टपैलू खेळाडू संघाला केवळ फलंदाजीतच सखोलता देत नाही तर गोलंदाजीतही अधिक पर्याय उपलब्ध करून देतो.
वेस्ट इंडिजकडे १-२ नाही तर ७ खेळाडू बॉल आणि बॅट या दोन्हीने विरोधी संघाची दैना उडवू शकतो. कर्णधार रोव्हमन पॉवेलपासून ते आंद्रे रसेल, रोस्टन चेस आणि रोमॅरियो शेफर्डसारखे स्फोटक अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. हे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत एकहाती सामना फिरवू शकतात.
वेस्ट इंडिजचे अनेक फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. निकोलस पूरनबद्दल सांगायचे तर, त्याने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात २५चेंडूत ७५ धावा ठोकल्या. या खेळीत ८ षटकारांचाही समावेश होता. याआधी आयपीएलमध्ये ४९९ धावा केल्यानंतर तो वेस्ट इंडिजच्या संघाचाही भाग बनला आहे.
शिमरॉन हेटमायर मधल्या फळीतील फलंदाजी मजबूत करेल. कर्णधार रोव्हमन पावेल अनेक दिवसांपासून सहाव्या क्रमांकावर येऊन संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पॉवेल चौकारांपेक्षा षटकार मारणे अधिक पसंत करतो.
T20 विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही यजमान देश चॅम्पियन बनू शकलेला नाही. पण वेस्ट इंडिज हा असा संघ आहे जो जगातील कोणत्याही मैदानावर जाऊन विरोधी संघाची दैना उडवू शकतो.
एकीकडे रोव्हमन पॉवेल अँड कंपनीला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असून त्यांना चाहत्यांचाही पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजचा साखळी टप्प्यात अमेरिकेत एकही सामना होणार नाही, ज्यामुळे त्यांना पुढच्या फेरीत सहज जाणे सोपे होऊ शकते.
संबंधित बातम्या