सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने मालिका गमावली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाने १८ वर्षांनंतर घरच्या भूमीवर कसोटी मालिका गमावली.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला हा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. अशातच आता एक बातमी समोर आली असून ती धक्कादायक आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडिया ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच असणार नाही. आफ्रिका दौऱ्यात गंभीरच्या जागी माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे.
क्रिकबझ वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तात व्हीव्हीएस लक्ष्मण हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे पुढे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गंभीर टीम इंडियासोबत रवाना होणार आहे. बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने लक्ष्मण याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्याचे वृत्तात म्हटले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारी ४ टी-20 सामन्यांची मालिका अगोदर नियोजित नव्हती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या मालिकेचे आयोजन केले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला ८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर मालिकेतील शेवटचा सामना १५ नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ४ नोव्हेंबरपर्यंत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.
दुसरीकडे, २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया १० किंवा ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकते. अशा स्थितीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियासोबत राहणे शक्य झाले नसते.
व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत NCA मध्ये काम करणारा कोचिंग स्टाफदेखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत, ज्यात साईराज बहुतुले, हृषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष यांचा समावेश असू शकतो.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विष्णोई, अविनाश खान, विजयकुमार खान. यश दयाल.
संबंधित बातम्या