भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर याने दिल्लीकडून पदार्पण केले आहे. शुक्रवारी (ऑक्टोबर) झालेल्या एका सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी केली. अंडर-१९ विनू मांकड ट्रॉफीमध्ये त्याने ४९ धावांची निर्णायक खेळी केली, यामुळे संघाला मनिपूरविरुद्ध विजय मिळवता आला.
आर्यवीर सेहवागच्या ४९ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे दिल्लीने ६ गडी राखून विजय मिळवला. या अंडर-१९ क्रिकेट टूर्नामेंटमध्ये आर्यवीरमध्ये त्याच्या वडिलांची झलक पाहायला मिळाली.
या सामन्यात मणिपूरचा संघ संपूर्ण षटके संपण्यापूर्वीच १६९ धावांवर गडगडला होता. प्रत्युत्तरात दिल्लीने हे लक्ष्य २६ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. सार्थक राय याच्यासह आर्यवीर सलामीला फलंदाजीला आला होता.
दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावा जोडल्या. दरम्यान, आर्यवीर अतिशय शिस्तबद्ध शैलीत फलंदाजी करताना दिसला. त्याने ६४ चेंडूत ४९ धावा केल्या, या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकारही लगावला.
दिल्लीकडून कर्णधार प्रणव पंतने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४५ चेंडूत ७५ धावांची नाबाद खेळी खेळली. आर्यवीरने कर्णधारासोबत ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.
दरम्यान, आर्यवीरने याआधीही भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ट्रायल सामन्यात डीडीसीएकडून खेळताना त्याने १३६ चेंडूत १८३ धावांची शानदार खेळी केली होती.
पॉईंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर, दिल्ली सध्या पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून ग्रुप डी मध्ये अव्वल स्थानावर आहे. या गटात हरियाणा आणि गुजरात प्रत्येकी एक सामना जिंकून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
आता दिल्लीचा पुढील सामना ८ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश विरुद्ध होणार आहे, ज्यांना पहिल्या सामन्यात हरियाणाकडून ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
संबंधित बातम्या