भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तीन वनडे मालिकेसाठी विराट कोहलीही श्रीलंकेत आहे. अशातच विराट कोहलीसोबत गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोहली सराव करत असताना एका चाहत्याने त्याच्या समोरच 'चोकली-चोकली' ओरडायला सुरुवात केली. कोहलीने लगेच त्या दिशेने पाहिले. यानंतर चाहता शांत झाला. पण यावेळी कोहली प्रचंड संतापला असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. सोशल मीडियावर कोहलीला ट्रोल करणारे 'चोकली' हा शब्द वापरतात.
हा शब्द 'कोहली' आणि 'चोक' मिळून बनला आहे. कोहली मोठ्या सामन्यांमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी करू शकत नाही, असे या ट्रोलर्सचे मत आहे.
विशेष म्हणजे, २०१९ च्या विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा हा शब्द वापरण्यात आला होता, जेव्हा कोहली फक्त एक धाव करून बाद झाला होता. आयसीसी नॉकआऊट सामन्यात एक धावा काढून कोहली बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी २०१५ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध असाच प्रकार घडला होता.
टी-20 विश्वचषक २०२४ नंतर विराट कोहली पहिल्यांदाच टीम इंडियासाठी मैदानात उतरणार आहे. विराट सोमवारी सकाळी श्रीलंकेत पोहोचला. सोमवारी पहिला सराव पावसामुळे रद्द करण्यात आला. टी-२० विश्वचषकाच्या फायनलनंतर मंगळवारी (३० जुलै) कोहलीने प्रथमच नेट सराव केला.
बीसीसीआयने अद्याप सरावाचे अधिकृत व्हिडिओ शेअर केले नाही, पण चाहत्यांनी काही व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत ज्यात कोहली चांगली फलंदाजी करताना दिसत आहे.
कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुले वामिका आणि अयानसोबत गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये होता. ते तिथे कीर्तन ऐकताना दिसले. कोहलीला शुक्रवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत खेळायचे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतरचा हा त्याचा पहिला एकदिवसीय सामना असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विराट कोहली टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य असेल. अशा स्थितीत तो श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे फॉरमॅटमध्ये विराट कोहलीचा रेकॉर्डही मजबूत राहिला आहे. विराट कोहलीने २००८ साली या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
विराट कोहलीच्या श्रीलंकेविरुद्धच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर, त्याने २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १० शतकांसह २५९५ धावा केल्या आहेत. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममधला त्याचा रेकॉर्ड आणखी चांगला आहे. त्याने येथे ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६४४ धावा केल्या आहेत, ज्यात ४ चार शतकांचा समावेश आहे. या मैदानावर विराट कोहलीने शेवटच्या वेळी आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी केली होती, ज्यामध्ये त्याने नाबाद १२२ धावा केल्या होत्या आणि भारताने तो सामना २२८ धावांनी जिंकला होता.
संबंधित बातम्या