Simon Doull On Virat Kohli : आयपीएल २०२४ संपले आहे. या स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. पण याच दरम्यान न्यूझीलंडचे समालोचक सायमन डुलने एक मोठा खुलासा केला आहे.
खरं तर, भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकशी संवाद साधताना सायमन डुल म्हणाले की, आयपीएलदरम्यान विराट कोहलीच्या कामगिरीवर टीका केल्याबद्दल त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
विराट कोहलीच्या फॅन फॉलोइंगबद्दल कोणालाही सांगण्याची गरज नाही. कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि लोक त्याला आपला आदर्श मानतात. कोहलीने आपल्या खेळाची पातळी एवढी उंच नेऊन ठेवली आहे की त्याच्याशी बरोबरी करणे कोणत्याही युवा खेळाडूसाठी कठीण आहे. पण गेल्या काही काळापासून कोहलीच्या टी-20 स्ट्राईक रेटबद्दल बरीच चर्चा होत आहे.
कोहलीच्या स्ट्राईक रेटवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या यादीत आणखी एक नाव समाविष्ट आहे आणि ते म्हणजे न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचे प्रसिद्ध समालोचक सायमन डुल. डुल यांनी विराट कोहलीच्या कामगिरीवर अनेकदा टीका केली.
सायमन डुल यांनी सांगितले की, विराट कोहलीवर टीका करणे त्यांना खूप महागात पडले, कारण त्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. आयपीएल २०२४ च्या मोसमातील विराट कोहलीच्या कामगिरीवर टीका केल्याबद्दल त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे सायमन डुल यांनी सांगितले.
डुल म्हणाले की, कोहलीशी त्यांचे संबंध खूप चांगले आहेत आणि त्यांनी कधीही आरसीबीच्या स्टार खेळाडूवर वैयक्तिक हल्ले केले नाहीत परंतु खेळाबद्दल बोलले आहेत. आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यादरम्यान डुल यांनी विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर टीका केली होती. कोहलीने चांगला सेट असतानाही अर्धशतकासाठी ८ धावा करण्यासाठी १० चेंडू घेतले.
त्यानंतर डुल यांनी कॉमेंट्रीत सांगितले की, आरसीबीचे स्टार फलंदाज वैयक्तिक कामगिरीसाठी खेळतात. डुल यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना धमक्या आल्या.
सायमन डल यांनी क्रिकबझवर दिनेश कार्तिकशी बोलताना याचा खुलासा केला. कार्तिकने चाहत्यांच्या प्रतिक्रियेवर आक्षेप घेतला आणि चांगली टीका आणि वैयक्तिक हल्ले यातील फरक समजून घेण्याची विनंती केली.
दिनेश कार्तिक म्हणाला, “भारतात हे दुःखद आहे. तुम्ही बास्केटबॉल किंवा बेसबॉलमध्ये जा, तुम्हाला नेहमी तेथील पंडित खेळाबद्दल बोलतांना आढळतील. काहीवेळा भारतीय चाहते हे ओळखू शकत नाहीत की लोक वैयक्तिकरित्या खेळाडूवर हल्ला करत आहेत की त्यांच्या तांत्रिक त्रुटींबद्दल बोलत आहेत. मला वाटतं, जर तुम्ही फरक ओळखलात तर विराटचं कौतुक होईल'.
संबंधित बातम्या