Virat Kohli 35th Birthday: क्रिकेट जगताचा सुपरस्टार विराट कोहली रविवारी (५ नोव्हेंबर) ३५ वर्षांचा होणार आहे. विराटने चीकूपासून किंग कोहली आणि ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम होण्यापर्यंत घेतलेली मेहनत जगातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
कोहली हा प्रत्येकी युवा खेळाडूसाठी प्रेरणास्थान आहे. वयाच्या ३५व्या वर्षीही कोहलीचा फिटनेस इतका जबरदस्त आहे की तो अजूनही त्याच्या निम्म्या वयाच्या खेळाडूंना टक्कर देऊ शकतो.
विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत झाला. विराटने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यापूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताने अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता. आज विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे.
पण त्याला त्याच्या कर्णधारपदाच्या काळात ICC च्या एकाही स्पर्धेची ट्रॉफी जिंकता आली नाही. ही खंत त्याला आयुष्यभर असेल. असे असले तरी, विराटने २०१४ मध्ये कसोटी संघाचा कर्णधार झाल्यापासून संघाला परदेशी भूमीवर लढायला शिकवले. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक मोठे यश संपादन केले आहेत.
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर-१ टीम बनली, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना त्याच्या भूमीवर पराभूत करण्यात टीम इंडियाला यश आले.
यानंतर विराट कोहली २०१७ मध्ये तो टीम इंडियाचा मर्यादित षटकांचा कर्णधारही बनला. या फॉरमॅटमध्येही कोहलीने संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. विराट कोहलीने एमएस धोनीनंतरचा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
सुरुवातीच्या काळात विराट कोहलीला त्याचे सहकारी खेळाडू आणि जवळचे मित्र चीकू नावाने हाक मारायचे. चंपक, चीकू या कॉमिक्समधील पात्राच्या नावावरून विराटचे चिकू हे नाव पडले.
आपल्या नेतृत्वाखाली अंडर-१९ टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या विराट कोहलीने २० ऑगस्ट २००८ रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढील ४ वर्षांत तो संघाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून उदयास आला.
विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात फिट खेळाडूंपैकी आहे. त्याच्याच प्रेरणेने संघातील इतर खेळाडू तसेच युवा खेळाडू आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देऊ लागले. २०१२ पासून आजपर्यंत विराट आपल्या फिटनेसमुळे क्वचितच सामन्यातून बाहेर पडला आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराटकडे कसोटी क्रिकेटचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पाहतात.
विराट हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. यातील ४० सामने भारताने विराटच्या नेतृत्वात जिंकले. कसोटी कर्णधार म्हणून त्याने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला मालिका विजय नोंदवला होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी मालिका विजय नोंदवला. वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकली, कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यानंतर २०२१ मध्ये प्रथमच टेस्ट चॅम्पियनशिपचे फायनल गाठले.
भारतातही कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. मायदेशात खेळल्या गेलेल्या ३१ पैकी २४ कसोटी सामने भारताने विराटच्या नेतृत्वात जिंकले आहेत. तर फक्त दोन कसोटी सामने गमावले आहेत.
व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही विराटच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड उत्तम आहे. विराटने ९५ वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतत्व केले आहे. यातील ६५ सामने जिंकले आहेत तर २७ सामन्यात संघ पराभूत झाला आहे. तसेच, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी भूमीवर ४२ वनडे सामने खेळले, यातील २९ जिंकले आणि ११ गमावले आहेत.
संबंधित बातम्या