भारतीय संघाने घरच्या मैदानावरील बांगलादेशविरुद्ध ३ टी-20 सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना आज बुधवारी (९ ऑक्टोबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ८६ धावांनी जिंकला.
याआधी ग्वाल्हेरमध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशचा अवघ्या ११.५ षटकांत ७ विकेट्स राखून पराभव झाला होता.
या सामन्याचाच हिरो नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग हे फलंदाज होते, ज्यांनी स्फोटक शैलीत अर्धशतक ठोकले. यामुळे भारतीय संघाने बांगलादेशसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवता आले. यानंतर गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना रडवले आणि संपूर्ण संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावाच करू शकला.
नितीश रेड्डीने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने ४ षटकात २३ धावा देत २ बळी घेतले.
बांगलादेशकडून शेवटची मालिका खेळणाऱ्या महमुदुल्लाने शानदार फलंदाजी करत ४१ धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. नितीश रेड्डी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रायन पराग यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
भारताकडून नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी शानदार अर्धशतके झळकावली, ज्याच्या बळावर संघाने २० षटकांत ९ गडी गमावून २२१ धावा केल्या. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताने वेगवान सुरुवात केली. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच भारताला तीन0 धक्के देत संघाला अडचणीत आणले.
सुरुवातीच्या धक्क्यानंतर नितीश आणि रिंकूने आक्रमक फलंदाजी केली आणि चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान नितीशने आपला दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळताना कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. नितीशने आपली आक्रमक फलंदाजी थांबवली नाही आणि फटके खेळणे सुरूच ठेवले.
नितीश मात्र ३४ चेंडूंत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७४ धावा करून बाद झाला. नितीश बाद झाल्यानंतर रिंकू सिंगनेही अर्धशतक झळकावले, मात्र तो २९ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
शेवटी हार्दिक पांड्याने काही मोठे फटके खेळले आणि भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली, पण भारतीय संघाने शेवटच्या षटकात ३ विकेट गमावल्या. हार्दिक १९ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा करून बाद झाला.
बांगलादेशकडून रिशाद हुसेनने ३ तर तस्किन अहमद, तन्झिम हसन शाकिब आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी २ गडी बाद केले.
संबंधित बातम्या