Longest Test Match Ever South Africa vs England: क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट असलेल्या कसोटीची कथा खूप जुनी आहे. अर्थात आजच्या काळात टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बोलबाला आहे, पण अनुभवी क्रिकेटपटू आजही कसोटी क्रिकेटलाच खरे क्रिकेट मानतात. सध्या कसोटी सामने जास्तीत जास्त ५ दिवस खेळले जाऊ शकतात.
पण आज आपण १२ दिवस चाललेल्या आणि क्रिकेटमधील सर्वात लांबलेल्या मॅचबद्दल जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या सामन्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळाले आहे. या कसोटी सामन्याला टाइमलेस टेस्ट असे नाव देण्यात आले. या कसोटीचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन दिवसांच्या विश्रांतीचाही समावेश होता.
हा सामना १९३९ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात डर्बनमध्ये खेळला गेला होता. हा सामना ३ मार्चला सुरू झाला आणि १४ मार्चपर्यंत चालला. पावसामुळे ११ आणि १२ तारखेला सामना होऊ शकला नाही. १४ मार्चच्या संध्याकाळी इंग्लंड विजयापासून ४२ धावा दूर होता, पण पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला.
कारण त्यादिवशी इंग्लंडच्या संघाला दोन दिवसांचा प्रवास करून केपटाऊन पोहोचायचे होते. तिथे त्यांचे जहाज परतीच्या प्रवासाची वाट पाहत होते. अशा स्थितीत सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्यात एकूण ६८० षटके टाकण्यात आली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम खेळताना ५३० धावा केल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात २२९ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात ४२३ धावा केल्या होत्या. तिसरा दिवस रविवार असल्याने विश्रांतीचा दिवस होता, तर चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव ५३० धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने १ विकेटच्या मोबदल्यात ३५ धावा केल्या होत्या.
पाचव्या दिवशी इंग्लंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २६८ धावा केल्या. यानंतर पाहुण्या संघाचा पहिला डाव ३१६ धावांत आटोपला आणि दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांची आघाडी मिळाली.
सहाव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात तीन गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या आणि आपली आघाडी आणखी मजबूत केली. संघाचा दुसरा डाव ४८१ धावांत आटोपला आणि इंग्लंडला विजयासाठी ६९६ धावांचे लक्ष्य दिले.
आठव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने एका विकेटवर २५३ धावा केल्या होत्या. पावसामुळे ९व्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाहून गेला. दहावा दिवस रविवार असल्याने विश्रांतीचा दिवस होता.
यानंतर ११व्या दिवशी इंग्लंडने तीन गड्यांच्या मोबदल्यात ४९६ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी आणखी २०० धावांची गरज होती.
हा तो दिवस होता जेव्हा १९३० मध्ये किंग्स्टनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याला मागे टाकत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सर्वात जास्त काळ चालणारा सामना बनला होता.
इंग्लंड संघाला ट्रेनने केपटाऊनला जावे लागणार होते, जेथे त्यांना मायदेशी परतण्यासाठी बोट पकडायची होती, त्यामुळे १२ व्या दिवसाला सामन्याचा शेवटचा दिवस घोषित करण्यात आले, कारण त्याच दिवशी इंग्लंडचे खेळाडू संध्याकाळी रवाना होणार होते.
शेवटच्या दिवशी चहापानाच्या वेळेपर्यंत इंग्लंडने ५ विकेट्सवर ६५४ धावा केल्या होत्या आणि ५ विकेट्स शिल्लक असताना त्यांना विजयासाठी फक्त ४२ धावांची गरज होती. मात्र त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सामना पुढे चालू ठेवता आला नाही. इंग्लंडकडून धावांचा पाठलाग करताना पॉल गिल आणि वॉली हॅमंड यांनी संघाकडून शतकी खेळी खेळली, तर बिल एडरिचने द्विशतक झळकावले.
संबंधित बातम्या