Team India Welcome Schedule : विश्वविजेता भारतीय संघ आज (४ जूलै) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. याआधी भारतीय खेळाडू खराब हवामानामुळे बार्बाडोसमध्ये अडकून पडले होते. यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय खेळाडू सोमवारी न्यूयॉर्कला पोहोचणार होते, मात्र खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही.
पण आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे खेळाडू चार्टर विमानाने भारतात पोहोचले आहेत, परंतु आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी खूप थकवणारा ठरू शकतो.
भारतीय संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक ट्रॉफीसह सकाळी ६:०९ वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती. चॅम्पियन संघ आणि ट्रॉफीची झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. सर्व चाहते आनंदाने भरून आले. चाहते भारत माता की जयच्या घोषणा देत होते. त्यांच्या हातात तिरंगा होता.
आज भारतीय खेळाडू दिल्लीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे खेळाडू पीएम मोदींसोबत नाश्ता करतील. यानंतर भारतीय खेळाडू मुंबईला रवाना होतील. मुंबईत ओपन टॉप बसमधून टीम इंडियाच्या खेळाडूंची भव्य विजयी मिरवणूक निघणार आहे.
भारतीय खेळाडूंसोबत सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबातील सदस्य आहेत. त्याचवेळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळपासूनच प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी झाली होती.
आज मुंबईतील रस्त्यांवर क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळेल, असे मानले जाते. यासाठी सर्व व्यवस्था आधीच करण्यात आली आहे.
बार्बाडोस येथे झालेल्या टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले, पण यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या बळावर भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या.
त्याचवेळी भारताच्या १७६ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत सर्वाधिक ५२ धावा केल्या, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.
संबंधित बातम्या