भारतीय महिला क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील गट सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने (१३ ऑक्टोबर) हरमनप्रीत कौरच्या संघाचा ९ धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा होता.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ग्रुप स्टेजचे चारही सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीमने २ जिंकले आहेत आणि २ हरले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. आता टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानने पुढचा सामना जिंकणे गरजेचे झाले आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे, ज्यामध्ये एकूण ५ संघ आहेत. सर्व संघांना ४-४ सामने खेळायचे आहेत, त्यानंतर अव्वल २ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
गटात अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे, तर गटात तळाच्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेचा संघ बाहेर पडला आहे.
आता उपांत्य फेरीतील स्थानासाठी भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. टीम इंडियाने आपले चारही सामने खेळले आहेत. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांना आज, सोमवारी (१४ ऑक्टोबर) एकमेकांविरुद्ध गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळायचा आहे.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवावा, अशी प्रार्थन टीम इंडियाला करावी लागणार आहे.
न्यूझीलंडचे ३ सामने खेळून ४ गुण आहेत, तर पाकिस्तानचे ३ सामने खेळून २ गुण आहेत. तर टीम इंडियाचे ४ सामने खेळून ४ गुण आहेत. अशा परिस्थितीत जर न्यूझीलंडने शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले तर किवी महिला संघ थेट ६ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल.
दुसरीकडे, जर पाकिस्तानने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला, तर उपांत्य फेरीच्या शर्यतीतील तिन्ही संघांचे गुण समान (४-४) होतील. मग या स्थितीत चांगला नेट रनरेट असलेला संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. सध्या टीम इंडियाचा नेट रन रेट सर्वोत्तम आहे.
त्यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करावा अशी प्रार्थना टीम इंडियाला करावी लागेल.
संबंधित बातम्या