T20 world cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ मधील सेमी फायनलचे संघ निश्चित झाले आहेत. ब गटातून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. तर अ गटातून टीम इंडिया आणि अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.
टी-20 विश्वचषकाच्या सुपर ८ मधील गट १ च्या सामन्यात (२४ जून) भारताने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने सुपर-८ च्या गट-१ मध्ये पहिले स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली.
तर २५ जूनला सुपर ८ च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ८ धावांनी पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तान पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचा सेमी फायनल सामना खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान
२७ जून, सकाळी ६ वाजता, त्रिनिदाद
इंग्लंड वि. भारत
२७ जून, रात्री ८ वाजता, गयाना
अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत सेमी फायनल गाठली. बांगलादेशच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आता अफगाणिस्तान २७ जूनला भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता आफ्रिकेला भिडणार आहे. सेमी फायनलचा हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाईल.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद ११५ धावा केल्या होत्या. सेमी फायनल गाठण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावाच लागणार होता. अशा स्थितीत अफगाण गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी ११५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला आणि सामना जिंकत सेमी फायनलचे तिकिट मिळवले.
बांगलादेशच्या डावात पाऊस आला त्यामुळे त्यांच्या डावाचे एक षटक कमी करण्यात आले. बांगलादेशकडून लिटन दास अर्धशतक (५४) करून शेवटपर्यंत क्रीजवर होता, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने २६ धावात ४ तर राशीद खानने २३ धावात ४ विकेट घेतले.
टी-20 विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जून रोजी होणार आहे. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर आतापर्यंत भारतीय संघाने २०२४ च्या टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
भारतीय संघ २०२२ च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही पोहोचला होता. त्यावेळीही भारताचा सामना इंग्लंडशी झाला होता. ॲडलेड ओव्हलवर खेळवण्यात आलेला सामना इंग्लंडने १० गडी राखून जिंकला. भारतीय संघाने १६८ धावा केल्या होत्या. इंग्लंडने १६ षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. जोस बटलरच्या बॅटमधून ८० धावा झाल्या. यावेळीही बटलर संघाता कर्णधार आणि सलामीवीर आहे.
भारताने ५ विकेट्सवर २०५ धावांची मजबूत धावसंख्या उभारली. कर्णधार रोहित शर्माने ४१ चेंडूत ९१ धावा केल्या. यानंतर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाला ७ विकेट्सवर केवळ १८१ धावा करता आल्या. ट्रॅव्हिस हेडने ४३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली.
संबंधित बातम्या