सरफराज खान हे नाव गेल्या काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आहे. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक रणजी मोसमात जवळपास १ हजार धावा केल्या आहेत. तरी त्याला टीम इंडियात येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. पण आता टीम इंडियात आल्यानंतर त्याने आपण कोणत्या प्रकारचे खेळाडू आहोत, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
वास्तविक, सरफराजला टीम इंडियाच्या कसोटी संघात खेळताना पाहण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. याचे कारण देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची दमदार कामगिरी होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी हजारो धावा करूनही सरफराज खानकडे दुर्लक्ष केले जात होते.
पण सर्फराजही ठाम राहिला. हिम्मत ठेवली. आज त्याची अनेक वर्षांची मेहनत फळाला आली. त्याला काही महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली. करिअरच्या पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले. त्याने त्या मालिकेत दोन अर्धशतकं केली.
आता तर त्याने करिअरचे पहिले शतक साजरे केले आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध त्याचे कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक आले. भारताकडून खेळणे आणि शतक झळकावणे हे केवळ सरफराजचे स्वप्न नव्हते तर संपूर्ण खान कुटुंबाचे स्वप्न होते. सरफरजाने ११० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने शतकी खेळी केली.
सरफराजचे वडील नौशाद खान यांनी आपल्या दोन्ही मुलांना (सरफराज खान आणि मुशीर खान) टीम इंडियाचे क्रिकेट बनवण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनतही घेतली. सकाळी उठून मुलांना मैदानात घेऊन जाणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे, हे काम त्यांनी न थकता केले. आज त्याची फळे आता संपूर्ण खान कुटुंबाला मिळत आहेत.
सरफराज आता भारताकडून खेळत आहे, तर धाकटा भाऊ मुशीर देशांतर्गत क्रिकेटसाठी जोरदार तयारी करत आहे.
सरफराज खानने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर जो आनंद साजरा केला. त्या सेलिब्रेशनमधून तो खूप काही सांगून गेला.
२६ वर्षीय सरफराज खानने ११० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने चौकारासह आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर खानने आनंदाने उंच उडी मारली आणि मैदानात धावायला सुरुवात केली. यानंतर त्याने आपली बॅट हवेत फिरवत सेलिब्रेशन केले.
त्याच्या या सेलिब्रेशनमध्ये एक वेगळाच आनंद होता. जणू काही तो आपल्या वडिलांना सांगत होता की बाबा मी हे करून दाखवले आहे. सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक शतके झळकावली आहेत. पण हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. त्यामुळे हा क्षण त्याच्यासाठी सर्वात खास होता, जो त्याने अशा पद्धतीने साजरा केला.
विशेष म्हणजे, सरफराज जेव्हा फलंदाजीला आला होता, त्यावेळी टीम इंडिया अडचणीत होती. तसेच, बोर्डावर किवी संघाकडे मोठी आघाडी होती. रोहित शर्मा बाद झाला होता. अवघड खेळपट्टीवर त्याला विराट कोहलीसोबत भागीदारी करावी लागली. सरफराजने मोठ्या हुशारीने फलंदाजी करत विराट कोहलीवरील दबाव कमी केला. त्याने चांगल्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. सर्फराज आगामी काळात भारतीय मधल्या फळीचा महत्त्वाचा भाग बनू शकतो.
संबंधित बातम्या