टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने दुलीप ट्रॉफीत शानदार शतकी खेळी केली आहे. त्याने भारत डी संघासाठी वादळी १०६ धावांची खेळी केली. संजूने भारत बी संघाविरूद्ध अवघ्या ९५ चेंडूत शतक पूर्ण केले.
शतकानंतर तो १०६ धावांवर बाद झाला. संजूने आपल्या खेळीत १०१ चेंडूत १२ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले. संजू सॅमनच्या प्रथम श्रेणी करिअरचे हे ११वे शतक आहे. हे वृत्त लिहिपर्यंत भारत डी संघाने ८ बाद ३४७ धावा केल्या होत्या.
संजूच्या फलंदाजीबद्दल सांगायचे तर, संजू उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आणि त्याच्या क्रिएटिव्ह शॉर्ट्सने चाहत्यांना रोमांचित केले. विशेष म्हणजे, संजू याआधी संघाचा भाग नव्हता पण दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे संजूला ही संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.
संजू सॅमसनचे शानदार आक्रमण हे अनंतपूर येथील दुलीप ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीचे वैशिष्ट्य ठरले. संजूने आपल्या खेळीत १२ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले.
तत्पूर्वी या सामन्यात भारत ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारत डीचे सलामीवीर देवदत्त पडिक्कल (९५ चेंडूत ५० धावा, ८ चौकार) आणि श्रीकर भरत (१०९ चेंडूत ५२ धावा, ९ चौकार) यांनी १०५ धावांची शानदार भागीदारी केली. कर्णधार श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला.
यानंतर रिकी भुई (८७ चेंडूत ५६ धावा, ९ चौकार) आणि निशांत सिंधू (१९) यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. याशिवाय भारत डी संघाचा अन्य कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. भारत ब संघाकडून नवदीप सैनीने ५, फिरकी गोलंदाज राहुल चहरने ३ आणि मुकेश कुमारने १ बळी घेतला.
संबंधित बातम्या