रणजी ट्रॉफी २०२४-२५ ची पहिली फेरी खेळली जात आहे. यातील मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील सामना रोमांचक वळणार पोहोचला आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या ऋतुराज गायकवाड याने दुसऱ्या डावात महाराष्ट्रासाठी शतक झळकावले. त्याने अवघ्या ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. गायकवाड महाराष्ट्राचे कर्णधारपद सांभाळत असून त्याच्या शतकामुळे संघ मजबूत स्थितीत आला आहे.
दरम्यान, या सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ १२६ धावांवर आटोपला होता, त्याला प्रत्युत्तरात मुंबईने श्रेयस अय्यर आणि आयुष म्हात्रे यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ४४१ धावा केल्या. अशा स्थितीत मुंबईला पहिल्या डावात ३१५ धावांची आघाडी मिळाली होती.
गायकवाडचे शतक अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत अ संघ हा लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तसेच, या दौऱ्यासाठी ऋतुराजला भारत अ संघाचा कर्णधार बनवले जाणार, अशी अटकळ बांधली जात आहे. तसेच, त्यानंतर बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही खेळली जाणार आहे. या मालिकेत गायकवाड बॅकअप सलामीवीर असू शकतो.
गायकवाडने ११४.९ च्या स्ट्राईक रेटने खेळत आपले शतक पूर्ण केले आहे. याआधी गायकवाड दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये इंडिया सी संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. तो या स्पर्धेत आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ३ सामन्यांच्या ६ डावात दोन अर्धशतकांसह २३२ धावा केल्या होत्या.
मात्र इराणी चषकात शेष भारताचे कर्णधारपद भूषवताना त्याला केवळ ९ धावा करता आल्या होत्या, मात्र आता रणजी ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात शतक झळकावून त्याने चांगल्या फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २२ ेनोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, परंतु त्याआधी भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघासोबत सराव सामना खेळणार आहे. भारताच्या १५ सदस्यीय संघात ऋतुराज गायकवाडला बॅकअप सलामीवीर म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या