Virat Kohli Trolled Against Rajasthan Royals: जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने राजस्थानसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ७२ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. विराटने अवघ्या ६७ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतरही विराट कोहलीला सेल्फीश म्हणून ट्रोल केले जात आहे. विराट कोहली स्वत:साठी खेळतो, त्याला संघाची पर्वा नाही, असे नेटकरी बोलत आहेत.
याआधी विराट कोहली संथ खेळीमुळे ट्रोल होत असे. मात्र,राजस्थानविरुद्ध सामन्यात त्याने १५७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. कोहलीला सेल्फीश म्हणत एका चाहत्याने असाही आरोप केला की, विराटमुळे फाफ डू प्लेसिसवर दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्याने त्याची विकेट गमावली. डू प्लेसिसला त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु, राजस्थानविरुद्ध त्याने ४४ धावा करण्यासाठी ३३ चेंडूचा सामना केला. त्याचा स्ट्राइक रेट १३३ होता.
विराट कोहलीने ९० ते १०० धावांपर्यंत अतिशय संथपणे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. सर्वात संथ शतकी खेळी खेळण्याच्या बाबतीत कोहली संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता, ज्याने २००९ मध्ये बंगळरूसाठी खेळताना डेक्कन चार्जसविरुद्ध ६७ चेंडूत शतक झळकावले. एकीकडे कोहलीला ट्रोल केले जात असतानाच अनेक लोक त्याच्या समर्थनातही आले आहेत. एकीकडे कोहलीने ७२ चेंडूत ११३ धावा केल्या आहेत. तर, उर्वरित खेळाडूंनी ४८ चेंडूत ५९ धावा केल्या.
विराट कोहलीने शनिवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमधील विक्रमी आठवे शतक झळकावले. कोहलीने ७२ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी केली. ज्यात १२ चौकार आणि ४ षटकाराचा समावेश आहे. आरसीबीच्या माजी कर्णधाराचे रॉयल्सविरुद्धचे हे पहिलेच शतक होते. आयपीएलमध्ये ७ हजार ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
संबंधित बातम्या