इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने रॉयल विजय मिळवला.
विशेष म्हणज, या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. आरसीबीसाठी प्रथम कोहलीने नाबाद शतक झळकावले आणि त्यानंतर जोस बटलरही राजस्थानसाठी शतक झळकावण्यात यशस्वी ठरला. राजस्थान संघाने आरसीबीवर मात करत या मोसमात विजयी मोहीम सुरू ठेवली आहे.
राजस्थानचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे, तर आरसीबीने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. विराट कोहलीच्या नाबाद ११३ धावांच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या होत्या,
मात्र बटलरचे शतक आणि कर्णधार संजू सॅमसनच्या ६९ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने ५ चेंडू शिल्लक असताना ४ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा करत विजयाची नोंद केली.
आरसीबीवरील या विजयासह, राजस्थान संघ ४ सामन्यांत ४ विजय आणि ८ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर कोलकाता नाइट रायडर्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मोहम्मद सिराजने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला बाद करत आरसीबीला दुसरा विकेट मिळवून दिला. सॅमसन ४२ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला. यासह त्याची बटलरसोबत दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी तुटली. सध्या बटलर ४४ चेंडूत ७७ धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. त्याच्यासोबत रियान पराग हा नवा फलंदाज म्हणून आला आहे.
यशस्वी जैस्वाल शुन्यावर बाद झाल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी राजस्थानचा डाव सावरला आहे. या दोन्ही फलंदाजांच्या जोरावर राजस्थानने पॉवरप्ले संपेपर्यंत एका विकेटवर ५४ धावा केल्या. बटलर २२ चेंडूत ३९ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे आणि सॅमसनने १२ चेंडूत १५ धावा केल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य दिले आहे. आरसीबीने २० षटकांत ३ गडी गमावून १८३ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. कोहलीने ७२ चेंडूंचा सामना करताना नाबाद ११३ धावा केल्या.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोहली आणि फाफ डुप्लेसिसने शानदार शतकी भागीदारी करून सॅमसनचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ३ बाद १८३ धावा केल्या. राजस्थानकडून फिरकीपटू युजवेंद्र चहलने ४ षटकांत ३४ धावा देत २ बळी घेतले.
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक झळकावले आहे. आयपीएलच्या या मोसमातील हे पहिले शतक आहे. कोहलीने ६७ चेंडूत आयपीएलमधील आठवे शतक पूर्ण केले. कोहलीने आतापर्यंतच्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत.
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसचे अर्धशतक हुकले. राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने संघाला पहिला विकेट मिळवून दिला आहे. डुप्लेसिस ३३ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला. यासह कोहली आणि डुप्लेसिस यांच्यातील पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी तुटली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. राजस्थानचा एकही गोलंदाज कोहली आणि डुप्लेसिसला रोखू शकला नाही. आरीसीबने १२ षटकांनंतर बिनबाद १०७ धावा केल्या आहेत. डुप्लेसिस २९ चेंडूत ४० धावा आणि कोहली ४३ चेंडूत ५९ धावांवर आहे.
विराट कोहलीने आयपीएलच्या चालू हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. जयपूरमधील आयपीएलच्या गेल्या ९ सामन्यांमधले कोहलीचे हे पहिलेच अर्धशतक आहे. कोहलीने कर्णधार फाफ डुप्लेसिससह संघाला वेगवान सुरुवात करून दिली आहे. ११ षटकं संपल्यानंतर आरसीबीने बिनबाद ९८ धावा केल्या आहेत. सध्या कोहली ४० चेंडूत ५३ धावा आणि डुप्लेसिस २६ चेंडूत ३७ धावा करुन क्रीजवर आहे.
विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस या सलामीच्या जोडीने आरसीबीला दमदार सुरुवात करून दिली आहे. दोन्ही फलंदाजांनी ६ षटकात ५३ धावा ठोकल्या आहेत. सध्या कोहली २५ चेंडूत ३५ धावांवर तर डुप्लेसिस ११ चेंडूंवर १२ धावांवर खेळत आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट सब: रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
इम्पॅक्ट सब: सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशाक, स्वप्नील सिंग
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने या सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर आरसीबीसाठी सौरव चौहानने पदार्पण केले आहे.
जयपूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते, कारण येथे चेंडू बॅटवर चांगला येतो. नव्या चेंडूने गोलंदाजांना भरपूर स्विंग मिळेल, तर फिरकीपटूंनाही थोडा टर्न मिळेल. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करतो.
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात २७ वेळा सामना झालाआहे, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने १२ सामने जिंकले आणि आरसीबीने १५ सामने जिंकले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने ५ सामने जिंकले, तर आरसीबीनेही तेवढेच सामने जिंकले आहेत. नंतर फलंदाजी करताना राजस्थान संघाने ७ वेळा विजय मिळवला, तर आरसीबीने १० वेळा विजय मिळवला.
संबंधित बातम्या