आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ मार्च रोजी खेळला गेला. भारतीय संघाने तब्बल १४ वर्षांनंतर ICC बाद फेरीत ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. यासोबतच भारतीय संघानेही आपला खास विजय मोठ्या थाटात साजरा केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय नोंदवल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने जल्लोष साजरा केला रोहित शर्मा आणि विजयाचा हिरो विराट कोहली यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खरंतर, ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरी गाठल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील ब्रोमान्स पाहण्यासारखा होता. याशिवाय इतर खेळाडूंनी जोरदार आनंद साजरा केला.
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल भारतीय डावातील ४९ वे ओव्हर टाकायला आला. त्यावेळी भारताचा फलंदाज केएल राहुल क्रीजवर होता. केएल राहुलने ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर लांबलचक षटकार ठोकला. यानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा आनंद पाहण्यासारखा होता. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मिठी मारली.
चाहत्यांना दोन्ही भारतीय दिग्गजांना मिठी मारणे खूप आवडते. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी विराट कोहली याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मैदानात हजर होती. विजयानंतरच्या सेलिब्रेशनदरम्यान विराट कोहलीने अनुष्का शर्मासमोर सेलिब्रेशन केले. यादरम्यान एक प्रसंग असाही आला, जेव्हा अनुष्का शर्मा विराटचे सेलिब्रेशेन पाहून लाजली.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. त्याने ८४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासोबतच त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही मिळाला. कोहलीने आपल्या खेळीत ५ चौकार मारले .
भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव ४९.३ षटकांत २६४ धावांत गुंडाळला.
भारतीय संघाने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकांत ४ गडी राखून पार केले. किंग कोहलीशिवाय श्रेयस अय्यरने भारतासाठी महत्त्वपूर्ण ४५ धावा केल्या. तर केएल राहुल ४२ धावा करून नाबाद राहिला. हार्दिक पांड्यानेही शेवटी येऊन षटकार ठोकला. पंड्यानेही २८ धावांची चांगली खेळी केली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहली फॉर्ममध्ये नव्हता. पण आयसीसी स्पर्धेत प्रवेश करताच कोहलीचा फॉर्म परत आला. त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची अप्रतिम खेळी खेळली. आता अंतिम फेरीतही कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या