भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत जवळपास दोन वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर गेल्या महिन्यात बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत त्याने या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले. त्याने येताच शतक झळकावले. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.
बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंत काही खास करू शकला नाही. त्याने ४९ चेंडूंचा सामना करताना २० धावा केल्या होत्या. मात्र, पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय फलंदाज होता कारण संपूर्ण भारतीय संघ ४६ धावांत गारद झाला होता.
पण दुसऱ्या डावात टीम इंडियाने जोरदार कमबॅक केले आणि सामन्यावर पकड निर्माण केली आहे. युवा फलंदाज सरफराज खानने शतक केले. त्यानंतर ऋषभ पंतने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. पंतने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.
विशेष पंत पूर्णपणे बरा नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. पंत गुडघ्यावर मोठी पट्टी बांधून मैदानात उतरला फलंदाजीला उतरला आहे.
विशेष म्हणजे, ऋषभ पंतला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुखापत झाली होती. ऋषभ पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. तो मैदानाबाहेर लंगडत जाताना दिसला होता. त्यानंतर ध्रुव जुरेलने विकेटकीपिंग केले.
वास्तविक, न्यूझीलंडच्या डावात डेव्हॉन कॉनवे फलंदाजी करत होता. तेव्हा रविंद्र जडेजा गोलंदाजीला होता. अशा स्थितीत जडेजाचा एक चेंडू कॉनेवला समजला नाही. त्याने या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तो बीट झाला आणि चेंडू थेट विकेटकीपर ऋषभ पंतच्या गुडग्यांवर जाऊन आदळला. यावेळी पंतला प्रचंड वेदना होत होत्या. विशेष म्हणजे, पंतच्या याच उजव्या गुडघ्यावर सर्जरी झाली होती. २ वर्षांपूर्वी कार अपघातादरम्यान पंतच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, टीम इंडियाने हे वृत्त लिहिपर्यंत ७१ षटकात ३ बाद ३४४ धावा केल्या आहेत. आता टीम इंडिया केवळ १२ धावांनी मागे आहे. सर्फराज १२५ आणि पंत ५३ धावांवर खेळत आहेत.
संबंधित बातम्या