बंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात ऋषभ पंत ९९ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंतने १०५ चेंडूत ९९ धावा केल्या. पंतला वेगवान गोलंदाज विल्यम ओरूर्कीने क्लीन बोल्ड केले.
यानंतर आता ऋषभ पंत हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील असा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. ज्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याच्या आधी २०१२ मध्ये एमएस धोनी ९९ धावांवर बाद झाला होता.
विराट कोहली दुसऱ्या डावात ७० धावा करून बाद झाल्यावर ऋषभ पंत फलंदाजीला आला. पंत जेव्हा क्रीझवर आला तेव्हा भारताने ३ गडी गमावून २३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी स्फोटक शैलीत फलंदाजीला सुरुवात केली.
दोघांमध्ये १७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. सर्फराजने १५० धावा केल्या, तर पंतचा डाव ९९ धावांवर संपुष्टात आला. जर त्याने शतक पूर्ण केले असते तर तो धोनीला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला असता. दोघांनी आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ६-६ शतके झळकावली आहेत.
एमएस धोनी हा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला जो ९९ धावा करून बाद झाला. डिसेंबर २०१२ मध्ये नागपुरात भारत-इंग्लंड कसोटी सामना खेळला जात होता, ज्याच्या पहिल्या डावात धोनी ९९ धावांवर धावबाद झाला होता. त्याला ॲलिस्टर कूकने धावबाद केले. तो सामना अनिर्णीत संपला.
यानंतर गेल्या १० वर्षात एकही भारतीय फलंदाज कसोटी सामन्यात ९९ धावांवर बाद झाला नव्हता. शेवटच्या वेळी मुरली विजयला २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका धावेने शतक हुकले होते. त्यानंतर आता ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये ९९ धावा करून बाद होणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ९९ धावा करून बाद झालेले भारतीय फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. हे दोन्ही महान खेळाडू कसोटीत प्रत्येकी १० वेळा ९९ धावांवर बाद झाले होते.
संबंधित बातम्या