Ranji Trophy Most Searched Topic on Google : रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने २३ जानेवारीपासून सुरू झाले. विराट कोहली हादेखील रणजी ट्रॉफीत खेळणार, अशा बातम्या समोर आल्या. विराटने सौराष्ट्रविरुद्धचा सामना खेळला नाही. पण तो रणजी ट्रॉफीत कमबॅक करणार अशा बातम्या येताच विराट कोहली आणि रणजी ट्रॉफी हे टॉपिक इंटरनेटवर जोरदार ट्रेंड करू लागले.
कोहलीने १२ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले. तो गुरुवारपासून (३० जानेवारी) रेल्वेविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळत आहे. कोहलीच्या पुनरागमनाने इंटरनेटवर खळबळ उडाली. गेल्या २४ तासांत गुगलवर 'रणजी ट्रॉफी' या टॉपिकला सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.
विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे 'रणजी ट्रॉफी' हा गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा विषय बनला आहे. दिल्ली विरुद्ध रेल्वे सामना ३० जानेवारीपासून सुरू झाला, ज्यामध्ये रेल्वेने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांचा पहिला डाव २४१ धावांवर आटोपला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दिल्लीने एक विकेट गमावून ४१ धावा केल्या होत्या. यानंतर आज दुसऱ्या दिवशी विराट कोहली फलंदाजीला आला तेव्हा त्याला फक्त १५ चेंडू खेळता आले, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून फक्त ६ धावा आल्या. त्याला हिमांशू सांगवानने क्लीन बोल्ड केले.
विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये परतला होता, त्यामुळे अरुण जेटली स्टेडियमबाहेर हजारो चाहते जमा झाले होते. पहाटे ५ वाजल्यापासूनच लोकांनी मैदानाबाहेर रांग लावली होती.
या सामन्यासाठी DDCA ने अरुण जेटली स्टेडियमवर चाहत्यांना मोफत प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. मैदानात प्रवेश घेण्यासाठी लोकांना फक्त त्यांचे आधार कार्ड दाखवणे आवश्यक होते. एवढ्या मोठ्या गर्दीमुळे परिस्थिती इतकी बिघडली की मैदानाबाहेर परिस्थिती हाताळणे कठीण झाले, काही जण जखमीही झाले.
संबंधित बातम्या