टीम इंडियाने २९ जून रोजी झालेल्या टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. यासोबतच आयसीसी ट्रॉफीसाठी भारताची ११ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षाही संपुष्टात आली. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ड्रेसिंग रूममध्ये प्रेरणादायी भाषण केले.
राहुल द्रविडने आपल्या खेळाडूंचे आणि त्यांच्या लढाऊ भावनेचे कौतुक केले. द्रविड म्हणाला की, खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतील रेकॉर्ड्स विसरतील, परंतु असे क्षण त्यांच्या कायम स्मरणात राहतील.
बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड म्हणतोय, की "माझ्याकडे खरोखर शब्द नाहीत, परंतु मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, मला या संस्मरणीय विजयाचा एक भाग बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." हा क्षण तुम्हा सर्वांच्या लक्षात असेल. धावा आणि विकेट्स एखाद्यावेळेस लक्षात राहणार नाहीत; तुम्हाला तुमची कारकीर्द आठवणार नाही, पण असे क्षण तुम्हाला नेहमी आठवतील".
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन आयसीसी फायनल गमावल्या. यामुळे राहुल द्रविडवर टीकेची झोड उठली होती. पण आता द्रविडचा हेड कोचपदाचा कार्यकाळ विजयासह संपला.
टीम इंडियामध्ये 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्रविडने आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की, 'हा तुमचा क्षण आहे मित्रांनो... लक्षात ठेवा, हा कोणा एका व्यक्तीचा नाही, हा क्षण संपूर्ण संघाचा आहे. आपण एक संघ म्हणून जिंकलो. गेल्या महिनाभरात आपण जे काही केले, ते आपण एक संघ म्हणून केले. हे आपल्या सर्वांचे आहे, कोणा एका व्यक्तीचे नाही"s.