आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा १७वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनच ते टीम इंडियात दाखल होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ते खेळाडू.
स्फोटक फलंदाज राहुल त्रिपाठीने २०२३ मध्ये भारतासाठी ५ टी-20 सामने खेळले. मात्र, तो कोणत्याही सामन्यात स्वत:ला सिद्ध करू शकला नाही, त्यामुळे त्याला वगळण्यात आले. आयपीएल २०२४ च्या माध्यमातून तो पुन्हा भारतीय निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वळवू शकतो.
अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये (२०२३) वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर चहलला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आगामी आयपीएलमध्ये चहलही चांगली कामगिरी करून टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात दमदार एंट्री करू शकतो.
दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा नवदीप सैनीही अचानक भारतीय संघातून बाहेर पडला. त्याने २०१९ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. मात्र, २०२१ पासून त्याला पुन्हा निळी जर्सी घालण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत हा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी खूप खास असणार आहे.
स्विंग गोलंदाज दीपक चहरही डिसेंबर २०२३ नंतर भारतीय संघापासून दूर आहे. गेल्या वर्षभरात तो फारच कमी क्रिकेट खेळला आहे. दीपक IPL 2024 मधून पुन्हा एकदा टीम इंडियात एन्ट्री करण्याचा प्रयत्न करणार आहे.
आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉ भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याच्याकडे देखील आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याची चांगली संधी आहे. शॉ वेगवान धावा काढण्यासाठी ओळखला जातो. सध्या तो रणजी ट्रॉफी खेळत आहे.
संबंधित बातम्या