Jasprit Bumrah News in Marathi : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ICC कसोटी क्रमवारीत इतिहास रचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम असलेला बुमराह आता सर्वोच्च रेटिंग गुण मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.
बुमराहनं अलीकडंच निवृत्त झालेला फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला मागं टाकलं आहे. अश्विननं २०१६ मध्ये ९०४ गुणासह सर्वोच्च रेटिंग मिळवलं होतं. बुमराहनं नुकतीच अश्विनची बरोबरी केली होती आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तो नवा विक्रम रचण्यात यशस्वी ठरला होता. त्याच्या नावावर आता ९०७ रेटिंग गुण आहेत. बुमराह सर्वकालीन यादीत इंग्लंडच्या डेरेक अंडरवुडसह ९०७ रेटिंग गुणांसह १७ व्या स्थानावर आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-२ नं पिछाडीवर आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून खेळवला जाणार आहे. बुमराहनं आतापर्यंत या मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे आणि २० पेक्षा कमी सरासरीनं ३० बळी घेतले आहेत. मात्र, फलंदाजांची साथ न लाभल्यानं मालिकेत भारत पिछाडीवर गेला आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनंही क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्यानं चौथ्या कसोटीत ६ विकेट्स घेत १५ रेटिंग गुण मिळवले आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नेत्रदीपक विजयादरम्यान केलेल्या ९१ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर कमिन्सनं कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसरं स्थानही मिळवलं आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळताना बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी मार्च १९८३ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन इथं वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ५० सामन्यात २०० बळी घेण्याचा विक्रम केला होता. बुमराहनं त्याच्या ४४व्या कसोटीत ही कामगिरी केली आणि रवींद्र जडेजासह संयुक्तपणे २०० कसोटी विकेट घेणारा तो दुसरा भारतीय बनला.
संबंधित बातम्या