सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने विदर्भाचा ६ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या फलंदाजांनी क्वार्टर फायनलमध्ये मुंबई संघासाठी धमकाकेदार कामगिरी केली. या विजयासह मुंबईने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रमही केला.
या फॉरमॅटमधील बाद फेरीत सर्वात मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम मुंबईने केला आहे. टी-20 मध्ये २२० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठणारा मुंबई आता पहिला संघ बनला आहे.
या बाबतीत, मुंबईने पाकिस्तानच्या फैसल बँक टी-20 कप २०१० मधील एका सामन्याचा विक्रम मोडला. या स्पर्धेत कराची डॉल्फिन संघाने रावळपिंडी रॅम्सविरुद्ध २१० धावांचे लक्ष्य गाठले होते.
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर विदर्भाने त्यांना सामन्यात २२२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने १९.२ षटकात २२४ धावा करून पूर्ण केले.
या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईने १९.२ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. मुंबईकडून अजिंक्य रहाणेने ४५ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८४ धावा केल्या.
रहाणे आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी ७ षटकांत ८३ धावा जोडून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. डावखुरा वेगवान गोलंदाज दीपेश परवानी याने पृथ्वीला बाद करून ही भागीदारी मोडली.
कर्णधार श्रेयस अय्यर (५) आणि भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार सूर्यकुमार यादव (९) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा स्थितित मुंबईची धावसंख्या ११.१ षटकात तीन विकेट्सवर ११८ धावा झाली.
शेवटच्या ८ षटकात संघाला विजयासाठी १०४ धावांची गरज होती. रहाणे डावाच्या १६व्या षटकात १५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबे (२२ चेंडूत नाबाद ३७, १ चौकार, २ षटकार) आणि सुयांश शेडगे (१२ चेंडूत नाबाद ३६, १ चौकार, ४ षटकार) यांनी शेवटच्या ४ षटकात ६७ धावांची भागीदारी केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या