भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या अप्रतिम गोलंदाजी करत आहे. कोणत्याही संघाच्या फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे, कठीण जात आहे. अशातच आता कुलदीप यादवने काही जन्या घटनांवरुन आपल्या वेदना जाहीर केल्या आहेत. कुलदीप जेव्हा वाईट काळातून जात होता, त्यावेळी त्याच्या मदतीला कोणीही नव्हते, असे त्याचे म्हणणे आहे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा कुलदीप यादव व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये खराब फॉर्ममध्ये होता तेव्हा सर्वांनी त्याला चेंडूचा वेग कमी असल्याचे सांगितले होते, पण तो कसा वाढवायचा हे त्याला कोणी सांगितले नाही. यानंतर २०२० मध्ये कोरोनाच्या काळात यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्येही त्याला गुडघ्याला दुखापत झाली. यातून तो सावरला.
चेंडूंचा वेग कसा वाढवला हे विचारले असता? यावर कुलदीप भावूक झाला. कुलदीप म्हणाला की, 'सर्वांनी मला सांगितले की चेंडूला वेग हवा असतो पण तो कसा वाढवायचा हे मला कोणीही सांगितले नाही.' विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलचे मौल्यवान विकेट घेणारा कुलदीप म्हणाला, यावर उपाय शोधला पण टीम फिजिओ आशिष कौशिक यांचा सल्ला उपयुक्त ठरला.
तो म्हणाला, ‘जेव्हा मी दुखापतीतून सावरत होतो, तेव्हा फिजिओ आशिष कौशिक म्हणाले की उजव्या पायावर कमी वजन दिले पाहिजे. मी सरावातही असेच केले आणि सामन्यातील फरक मला जाणवला. हे एका रात्रीत घडले नाही. लय परत यायला ६ महिने लागले’.
चेपॉकची खेळपट्टी संथ गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे का असे विचारले असता? कुलदीप म्हणाला, 'मला नाही वाटत पण मला माझ्या चेंडूंचा वेग वाढवावा लागला. ग्लेन मॅक्सवेलला वेळ मिळाला नाही आणि त्याचप्रमाणे स्मिथला जडेजाने बाद केले. वळणासोबतच चेंडूचा वेगही महत्त्वाचा होता.'
या स्पर्धेत तीन फिरकीपटूंना जागा मिळेल का, असे विचारले असता तो म्हणाला, 'संपूर्ण स्पर्धेबद्दल माहिती नाही, पण तीन फिरकीपटूंना मैदानात उतरवता येईल, हे आम्ही चेन्नईमध्ये पाहिले आहे.'
संबंधित बातम्या