आयपीएल २०२४ मधील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. विशेषत: फ्रँचायझी कर्णधार बदलण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, मुंबई इंडियन्स संघ रिटेन खेळाडूंसोबतच कर्णधारपदाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.
गेल्या वर्षीच मुंबईने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली होती, पण तो संघ व्यवस्थित सांभाळू शकला नाही. पाच वेळचा चॅम्पियन संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही.
अशा स्थितीत संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि व्यवस्थापनाला रोहित शर्माला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवायचे आहे, परंतु रोहितने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.
संघाच्या कर्णधारपदात बदल करायचा असेल तर त्याच्या जागी सूर्यकुमार यादवकडे कमान सोपवावी, अशी रोहित शर्माची इच्छा आहे. कारण सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाचा टी-20 कर्णधार आहे.
IPL २०२५ साठी खेळाडूंना रिटेन करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सला आजच एकूण ५ रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांची नावे निश्चित झाली आहेत.
याशिवाय तिलक वर्मा आणि इशान किशन हे नावही असू शकते. याशिवाय मेगा ऑक्शनमध्ये RTM द्वारे एक खेळाडू निवडण्याचा पर्याय संघाला असेल.
मुंबईच्या रिटेन खेळाडूंच्या यादीत एकही परदेशी खेळाडू नाही. अशा स्थितीत फ्रँचायझींना मेगा लिलावात विचारपूर्वक बोली लावावी लागणार आहे. कारण टीम रिटेन्शनसाठी जवळपास ६५ कोटी रुपये खर्च करू शकते. मुंबईच्या सध्याच्या संघात अनेक परदेशी खेळाडू आहेत ज्यांच्यावर इतर संघांच्या नजरा लागल्या असतील. अशा स्थितीत मुंबईला लिलावात अत्यंत हुशारीने बोली लावावी लागणार आहे.
संबंधित बातम्या