IPL 2024 Playoffs Scenario : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आयपीएल २०२५ च्या ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ३ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर जीटीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या पराभवानंतरही मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर कायम आहे. मात्र, मुंबईच्या या पराभवामुळे टॉप-४ मधून बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स मध्ये थोडी आशा निर्माण झाली आहे. त्यांना अजूनही टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. एमआय विरुद्ध जीटी सामन्यानंतर प्लेऑफ समीकरणावर एक नजर टाकूया
- गुजरात टायटन्स - शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत, तर तीन गमावले आहेत. गुजरातच्या खात्यात सध्या १६ गुण आहेत. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी संघाला उर्वरित ३ पैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. मात्र, प्लेऑफसाठी पात्र ठरण्याबरोबरच टॉप-२ मध्ये टिकून राहण्यासाठी जीटीचे लक्ष असेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - आरसीबीची अवस्थाही गुजरातसारखीच आहे. ११ सामन्यांनंतर संघाच्या खात्यात १६ गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामन्यांमधून आणखी किमान एक सामना जिंकावा लागेल आणि अंतिम फेरीसाठी त्यांना दोन संधी मिळाव्यात यासाठी त्यांची नजर टॉप-२ मध्ये राहण्याकडेही असेल.
पंजाब किंग्ज - श्रेयस अय्यरच्या संघाचे ११ सामन्यांतील ७ विजयांसह खात्यात १५ गुण आहेत, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा त्याचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता. पंजाबचे पुढील तीन सामने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहेत. दिल्लीविरुद्धचा त्यांचा सामना मनोरंजक ठरू शकतो कारण डीसी प्लेऑफच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. पंजाबने त्यांना पराभूत केले तर मुंबईचा मार्ग सोपा होऊ शकतो.
मुंबई इंडियन्स - गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवानंतर एमआयचे १२ सामन्यांत १४ गुण झाले असले तरी त्यांचा नेट रन रेट (+१.१५६) अजूनही स्पर्धेतील सर्वोत्तम आहे. मुंबईचे पुढील दोन सामने पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहेत, जे करो या मरो सिद्ध होऊ शकतात.
दिल्ली कॅपिटल्स - मोसमाची शानदार सुरुवात करणाऱ्या दिल्ली संघाने आता आपली लय गमावली आहे. हा संघ ११ सामन्यांत ६ विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. पण अजून उशीर झालेला नाही. डीसीला अजूनही जास्तीत जास्त १९ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. जर संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले तर तो प्लेऑफसाठी दावा करू शकतो. त्यांचे पुढील तीन सामने पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्याशी आहेत. आता त्यांचे भवितव्य त्यांच्या हातात आहे.
कोलकाता नाईट रायडर्स - केकेआरला सर्वाधिक 17 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे, परंतु त्यांना उर्वरित तीन सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पराभूत करावे लागेल. कोलकात्यासाठी हे तीन सामने सोपे जाणार नाहीत. सीएसके आणि एसआरएच आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत आणि त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. त्याचबरोबर आरसीबी उत्तम लयीत धावत असून टॉप-२ मध्ये राहण्यासाठी केकेआरला कडवी टक्कर देणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोलकात्याला काहीतरी चमत्कार करावा लागेल.
लखनौ सुपर जायंट्स - ऋषभ पंतचा संघ अजूनही स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही कारण त्यांना अजूनही सर्वाधिक १६ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे, परंतु पराभवामुळे त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येऊ शकतो. एलएसजीचे सध्या ११ सामन्यांतून १० गुण आहेत. त्यांना पुढील तीन सामने आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळायचे आहेत.
संबंधित बातम्या